सुनील जयस्वाल यांची पत्रपरिषद : आत्महत्येने प्रश्न गुंतागुंतीचे होतातयवतमाळ : जगाचा पोशिंदा, सर्वांचा अन्नदाता, बळीराजा आज अस्मानी व सुलतानी व्यवस्थेचा बळी ठरतो आहे. निसर्गाच्या लहरी फेऱ्यातून कधी सुटका झालीच तर शोषणाने अनेक गिधाडे शेतकऱ्यांचे लचके तोडायला टपून बसलेले आहेत. आत्महत्येने प्रश्न सुटत नाही, तर अधिक गुंतागुंतीचे होतात. आत्महत्येनंतर कुटुंबाचे होणारे हाल पाहून संवेदनशील माणूस आत्महत्येपासून परावृत्त झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास ‘आत्मदाह’ या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक सुनील जयस्वाल यांनी येथे घेतलेल्या पत्रपरिषदेत व्यक्त केला. आत्महत्येनंतर आपल्या कुटुंबाला कोणता संघर्ष करावा लागतो, हे ‘आत्म्या’ला दाखविण्याचा चमत्कृतीजन्य प्रकार या चित्रपटातून दाखविण्यात आला आहे. आजपर्यंत आत्महत्येची कारणे आणि उपाय यावरच भर दिला गेला आहे. परंतु आत्महत्येनंतरचा भीषण संघर्ष वास्तवात मांडण्याचा प्रयत्न म्हणजे ‘आत्मदाह’ हा चित्रपट आहे. संघर्ष मृत्यूनंतरचा हे या चित्रपटाचे सूत्र आहे, असे त्यांनी सांगितले. हा चित्रपट माझा आहे, त्यातला मी एक घटक आहे, हे आपलेपण वाटावे यासाठी वऱ्हाडी बोलीत संवाद लिहिले, असे लेखक रणजित राठोड यांनी सांगितले. निर्माता सुनील जयस्वाल मित्र असल्याने हा चित्रपट करण्याचा निर्णय घेतला आणि त्यात यशस्वीही झालो, असे ते म्हणाले. अनेकांशी चर्चा करून कथालेखनासाठी चार महिन्यांचा वेळ लागला, असे त्यांनी सांगितले.चित्रपटाचा नायक म्हणजे आत्महत्या केलेला शेतकरी ही भूमिका ज्येष्ठ दिग्दर्शक आणि कलावंत राजाभाऊ भगत यांनी साकारली आहे. यापूर्वी मालिकांमधून, काही चित्रपटातून भूमिका साकारणारे अविश बन्सोड यांचीही यात भूमिका आहे. या चित्रपटाचे अधिकाधिक छायाचित्रण दाभडी, बोरगाव आणि लोणबेहळ येथे झाले आहे. सहायक दिग्दर्शक राजेश वाठोरे, गीत आणि संगीत सुभाष माळवी यांचे आहे. मामा मरगडे, रत्ना कोल्हापुरे, रितेश कुमार, सुप्रिया पाटील, सुनील जयस्वाल, प्राची सूर्यवंशी, संगीता बारी आदींच्या भूमिका या चित्रपटात आहे. शेतकरी आत्महत्येनंतरचा भीषण संघर्ष चमत्कृतीद्वारे मांडणारा वैदर्भीय कलावंतांचा ‘आत्मदाह’ हा चित्रपट आहे. पत्रपरिषदेला रणजित राठोड, राजाभाऊ भगत, अविश बन्सोड, प्रेमकिशन राठोड, राजेश वाठोरे, सुभाष माळवी, मामा मरगडे, अशोक कोठारी उपस्थित होते. (सांस्कृतिक प्रतिनिधी)
‘आत्मदाह’मध्ये वैदर्भीय कलावंत
By admin | Updated: September 10, 2015 03:04 IST