आपुलकीचे बक्षीस : ४८ वर्षांपासून जपल्या स्मृतीमुकेश इंगोले दारव्हाहरितक्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी शेतीनिष्ठ शेतकरी परशराम भागडे यांना बक्षीस म्हणून तब्बल ४८ वर्षापूर्वी सायकल दिली होती. या सायकलीवरून दारव्हा तालुक्यात परशराम भागडे यांनी हरितक्रांतीची प्रेरणा शेतकऱ्यांमध्ये निर्माण केली. आज ही सायकल त्यांच्या मुलाने गत ४८ वर्षापासून आपुलकीचा ठेवा म्हणून जपून ठेवली आहे. वसंतराव नाईक आणि शेती हे समीकरणच झाले होते. कृषीक्रांती करून वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्राला दुष्काळाच्या खाईतून बाहेर काढले. शेतकरी, शेतमजुरांवर ते भरभरुन प्रेम करायचे, १९६६ साली अवर्षणामुळे राज्यात भीषण स्थिती निर्माण झाली होती. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना हिंमत देण्यासाठी राज्यभर दौरे केले. त्यांची तळमळ पाहून अनेक शेतकरी प्रभावित झाले होते. शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या. दारव्हा तालुक्यातील शेलोडी येथील शेतकरी परशराम बळीराम भागडे हेही नाईकांच्या विचारांनी प्रेरित झाले होते. आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करून भरघोस उत्पादन घेत होते. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून १५ आॅगस्ट १९६८ रोजी महाराष्ट्र शासनाने शेतीनिष्ठ पुरस्काराने भागडे यांचा गौरव केला. तत्कालीन राज्यपाल पी.व्ही. चेरियन यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. दारव्हा तालुक्यातून पहिला बहुमान भागडे यांना मिळाल्याने वसंतरावांनी त्यांचे कौतुक केले. एवढेच नाही तर परशराम भागडे यांना वसंतराव नाईक यांनी सायकल बक्षीस म्हणून दिली. शेतकऱ्याला मिळालेली ती सायकल त्या काळी अनेकांना बळ देणारी ठरली. परशराम भागडे याच सायकलवरून गावागावात जाऊन शेतकऱ्यांमध्ये हरितक्रांतीची बिजे रोवत होती. काही काळानंतर परशराम भागडे यांचा मृत्यू झाला. परंतु ही अनमोल ठेव त्यांचे पूत्र विलास भागडे यांनी मोठ्या निष्ठेने जपली आहे. आजही ही सायकल त्यांच्या घरी आदराने ठेवलेली आहे. सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करणारी ही सायकल आजही शेलोडी येथील शेतकऱ्यांना प्रेरणा देते.
वसंतराव नाईक यांची हरित प्रेरणा देणारी सायकल
By admin | Updated: July 1, 2016 02:34 IST