लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : उत्तर भारतातील वेस्टर्न डिस्टबन्समुळे मंगळवारी सायंकाळी यवतमाळसह बाभूळगाव, कळंब, नेर, दिग्रस, पुसद या तालुक्यांत अवकाळी पाऊस कोसळला. बाभूळगाव तालुक्यातील अनेक गावात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली असून यामुळे हरभरासह तुरीच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यवतमाळ शहरात मंगळवारी सायंकाळी ४.३० च्या सुमारास अवकाळी पावसास सुरुवात झाली. याच वेळी बाभूळगाव, नेरसह, वणी, मारेगाव, कळंब तालुक्यातही मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. बाभूळगाव तालुक्यातील गणोरी, आलेगाव, अंतरगाव, दिघी, मुस्ताबाद, वाटखेड, नायगाव, कृष्णापूर, नागरगाव, पंंचगव्हाण, चिमनापूर, पिंपरी इजारा, इंदिरानगर, नांदुरा खुर्द, मालापूर या गावात अवकाळी पाऊस व गारपिटीने पिकांचे नुकसान केले. तर नेर तालुक्यातील चिखली कान्होबा, पिंपरी कलगाव येथेही अवकाळी पावसासह गारपीट झाली. कळंब तालुक्यातील सावरगाव, टालेगाव व पिंपळखुटी येथेही अवकाळी पाऊस झाला आहे.
- जिल्ह्यात सुमारे १ लाख हेक्टर क्षेत्रावर तुरीचे पीक असून सध्या ते काढणीच्या स्थितीत आहे. तर साधारण ८० हजार हेक्टर क्षेत्रावर हरभरा आहे. या दोन्ही पिकांसह फरदडीचा कापूस आणि पालेभाज्यांनाही या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. अवेळी कोसळलेल्या या पावसामुळे येणाऱ्या काळात हरभरावर अळीचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.- मागील आठवडाभरापासून जिल्ह्यात गारठा आहे. तापमानाचा पारा १६ वरून १२ गेला होता. त्यातच मंगळवारी सायंकाळी जिल्हाभरात झालेल्या अवकाळी पावसामुळे गारठा वाढण्याची चिन्हे आहेत.