यवतमाळ : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दलातील सेवाज्येष्ठ पोलीस कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांसाठी फौजदारी बहाल करण्यात आली होती. हा अवधी संपताच त्यांना मूळपदावर नेमण्यात आले. त्यामुळे अनेकांचा भ्रमनिरास झाला. मात्र शासनाने याची गंभीर दखल घेत त्यांना फौजदारी बहाल करण्यासाठी प्रयत्न चालविले आहे. त्याचाच एक भाग म्हणून या औटघटकेच्या फौजदारांची माहिती पोलीस महासंचालक कार्यालयाने मागविली आहे. राज्य पोलीस दलात फौजदारांची शेकडो पदे रिक्त होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सेवाज्येष्ठ पोलीस कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांसाठी तात्पूर्ती फौजदारी बहाल करण्यात आली होती. निवडणूक आटोपताच यवतमाळ जिल्हा पोलीस दलातील ४० तात्पुरत्या फौजदारांना त्यांच्या मूळ पदावर नेमण्यात आले. दोन महिन्यांची फौजदारी कायम होईल, अशी अनेकांना अपेक्षा असताना संबंधीत आदेशाने त्यांचा हिरमोड झाला. दरम्यान तात्पुरत्या फौजदारांना कायम करण्यात यावे ही मागणी विविध मार्गाने शासनाकडे पोहचविण्यात आली. त्याची गंभीर दखल घेत शासनाने तात्पुरत्या फौजदारांना कायम करण्याचे प्रयत्न चालविले आहे. यासंदर्भात मुंबई येथील पोलीस महासंचालक कार्यालयाच्या आस्थापना विभागाचे विशेष पोलीस निरीक्षक अतुलचंद्र कुळकर्णी यांचे एक पत्र नुकतेच जिल्हा पोलीस दलाला प्राप्त झाले. त्यामध्ये तात्पुरते फौजदार म्हणून सेवा दिलेल्या कर्मचाऱ्यांची इत्थंभूत माहिती मागविण्यात आली. त्यावरून ही माहीती पाठविण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. (स्थानिक प्रतिनिधी)
फौजदारांना देणार पुन्हा दोन महिन्यांची नियुक्ती
By admin | Updated: January 10, 2015 02:05 IST