स्वच्छतेचा मापदंड : नागरिक बघतच राहिलेनेर : शासनाने स्वच्छतेसाठी विशेष पुढाकार घेतला आहे. अनेक जण यात केवळ फोटोपुरता स्वच्छतेचा कांगावा करताना दिसत आहे. परंतु, नगराध्यक्ष पवन जयस्वाल यांनी रविवारी भरस्त्यात मृतावस्थेत पडलेला श्वान स्वत: उचलून स्वच्छतेचा नवा मापदंड घालून दिला.नेर-अमरावती मार्गावर एका श्वानाला भरधाव ट्रकने धडक दिली. यात श्वान ठार झाले. हे श्वान तेथेचे पडून होते. जाणाऱ्या-येणाऱ्यांनाही त्याचा त्रास होत होता. मात्र, कुणीही पुढे येऊन त्या श्वानाला बाजूला करत नव्हते. रविवार असल्याने नगरपरिषदेचे कर्मचारी हजर नव्हते. त्याच वेळी नगराध्यक्ष पवन जयस्वाल त्या रस्त्याने दुचाकीने निघाले होते. त्यांनी या श्वानाला पाहताच दुचाकी बाजूला उभी केली. स्वत: ते मृत श्वान रस्त्याच्या बाजूला केले. हा प्रकार पाहणारे नागरिकही क्षणभर वरमले. नगराध्यक्ष स्वत: स्वच्छता करू शकतो, तर आपण का करू नये, ही भावना अनेकांच्या मनात घर करून गेली.शहर स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी नगर परिषद प्रयत्न करीत आहे. मात्र, या प्रयत्नांना सर्वसामान्य जनतेकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची तेवढीच गरज आहे. परंतु, असे होताना दिसत नाही. तब्बल तीन तास मृत श्वान रस्त्यावर पडून असतानाही कुणीच त्याला बाजूला केले नाही. शेवटी शहराच्या प्रथम नागरिकानेच जबाबदारी घेतली. जोपर्यंत प्रत्येक नागरिक ‘मी’पणा सोडणार नाही, तोपर्यंत स्वच्छतेचे अभियान गतिमान होणार नाही, अशी प्रतिक्रिया नगराध्यक्ष पवन जयस्वाल यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली. (तालुका प्रतिनिधी)
नगराध्यक्षांनी उचलले रस्त्यावरील मृत श्वान!
By admin | Updated: October 14, 2015 02:55 IST