बोटोणी, जळका येथे हल्ला : बैल, शेळी आणि कालवड जखमी मारेगाव/बोटोणी : तालुक्यातील बोटोणी-जळका शिवारात वाघाने हल्ला करून तीन बकऱ्या, एक वासरू व एका बैलाला जखमी केले. या हल्ल्यामुळे बोटोणी-जळका शिवारात वाघाची दहशत निर्माण झाली आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली.जळका पोड येथील रहिवासी शेळके गुरूवारी सकाळी ९.३० वाजता जंगलात बकऱ्या चारण्यासाठी गेले होते. दुपारी ३ वाजताच्या सुमारास जंगलात दबा धरून बसलेल्या वाघाने बकऱ्यांच्या कळपावर अचानक हल्ला केला. शेळके हे आपला जीव वाचविण्यासाठी गावाकडे धावत सुटले. मात्र वाघाच्या या हल्ल्यात उत्तम परचाके, सूर्यभान आत्राम, पंजाब मेश्राम यांची प्रत्येकी एक बकरी जखमी झाली. घोगुलदरा येथील तुळशिराम कोंडेकार यांचे वासरूही वाघाने जखमी केले. याबाबत ग्रामस्थांना माहिती मिळताच उमरी येथील वन विभागाला माहिती देण्यात आली. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. वन कर्मचारी पंचनामा करून परत जात असताना सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास पुन्हा वाघाने हल्ला करून आनंद टेकाम यांचा एक बैल जखमी केला. त्या बैलाच्या शरीरावर वाघाचे पंजे उमटल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.बोटोणी-जळका परिसरात घनदाट जंगल असल्याने गेल्यावर्षी सराटी नजीकच्या सालई पोड येथील एका शेतकऱ्याचा वाघाने बळी घेतला होता. वसंतनगर, वाघदरा येथील एका शेतकऱ्याची बैलजोडी वाघाने जखमी केली होती. परिसरातील सराटी, खैरगाव, घोगुलदरा, आवळगाव, कान्हाळगाव, खंडणी, मेंढणी येथे घनदाट जंगल आहे. त्यात वाघाचा मुक्त संचार असतो. वाघाच्या मुक्त संचारामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. शेकऱ्यांना शेतात जाणे कठीण झाले आहे. मजूरही शेतात जाण्यास घाबरत आहेत. परिणामी शेती कामे खोळंबली आहेत. रबीतील सिंचनही रखडले आहे. या वाघाचा त्वरित बंदोबस्त करावी, अशी मागणी वन विभागाकडे करण्यात आली आहे. (शहर प्रतिनिधी/वार्ताहर)
वाघाची दहशत कायमच!
By admin | Updated: January 3, 2015 23:10 IST