पुसद तालुका : तब्बल नऊ वर्षांपूर्वीचे प्रकरणपुसद : पोळ्यात बैल न आणल्याच्या कारणावरून झालेल्या तलवार हल्लाप्रकरणात गाजीपूर येथील तीन जणांना एक वर्ष सक्त मजुरी आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी शरद देशपांडे यांनी हा निर्णय दिला आहे. विनोद रंगराव सरगर (३६), अशोक उत्तमराव सरगर (४६) आणि गोधाजी रामजी गोरे सर्व रा. गाजीपूर अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. उल्हास चव्हाण याच्यावर हल्लाप्रकरणात या तिघांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. २७ सप्टेंबर २००७ रोजी पोळा सणानिमित्त मिरवणुकीत बैल का आणले नाही या कारणावरून उल्हास चव्हाण याच्याशी वाद घालण्यात आला. याचे पर्यवसान त्याच्यावर तलवारीने हल्ल्यात झाले. उल्हासच्या तक्रारीवरून विनोद व अशोक सरगर आणि गोधाजी गोरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले. या खटल्यात एकूण सात साक्षी तपासण्यात आल्या. सदर तीनही आरोपींविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने त्यांंना शिक्षा सुनावण्यात आली. या खटल्यात सरकार पक्षातर्फे अॅड. नारायण पाईकराव यांनी युक्तीवाद केला. (प्रतिनिधी)
तलवार हल्ल्यातील तिघांना सक्तमजुरी
By admin | Updated: March 6, 2016 03:09 IST