नरेश मानकरलोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : एकमेकांवर जीव ओवाळून टाकणारे ते तीन मित्र... खेळण्यासाठी तिघेही चिमुरडे एकाच वेळी घराबाहेर पडतात... पण मृत्यूचा डोह जणू त्यांची प्रतीक्षा करीत असतो... पाण्याने भरलेल्या डबक्यात मासे पाहण्याचे निमित्त होते... आणि एकापाठोपाठ तिघेही पाण्यात बुडून मरण पावतात. काही क्षणात घडलेल्या या घटनेतून पांढरकवडावासी अद्यापही सावरले नाहीत. रविवारी पहाटे ऐन पोळ्याच्या दिवशी घडलेल्या या धक्कादायक घटनेने मृतांच्या कुटुंबीयांसह सारे शहरच हादरून गेले आहे.शहरातील श्यामनगरीत राहणारा सिद्धेश हा वांजरी येथील देवराव गेडाम आश्रमशाळेतील ज्येष्ठ शिक्षक विकास मोगरकर यांचा मुलगा. आदर्श हा आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील कर्मचारी बाळासाहेब राठोड यांचा मुलगा.तर संचेतन हा पांढरकवडातील कृषी केंद्राचे संचालक श्यामकिरण राठोड यांचा मुलगा. हे तिघेही एकमेकांचे जीवलग मित्र होते. आदर्श व संचेतन हे दोघे येथील गुरूकुल इंग्लिश मिडियम स्कूलचे पाचव्या वर्गाचे विद्यार्थी. तर सिद्धेश हा इरा इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये सहाव्या वर्गात शिकत होता. सुटीच्या दिवशी हे तिघेही ग्रीनपार्क वसाहतीजवळ असलेल्या राधेनगरी परिसरात आपापली सायकल घेऊन फिरायला यायचे. या परिसरात शासकीय कार्यालयाच्या नवीन इमारतीची कामे सुरू आहेत. समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहाचे काम पाच-सहा महिन्यांपूर्वीच झाले. बांधकाम सुरू असताना सिमेंट काँक्रीटचे मिश्रण तयार करण्यासाठी १८ ते २० फुटांचा खड्डा खोदण्यात आला होता. हाच खड्डा या तिन्ही बालकांसाठी काळ ठरला.खड्ड्यात पावसाचे पाणी आता शिगोशिग भरलेले होते. त्यातील मासे पाहत असताना सिद्धेश व आदर्श अचानक तोल जाऊन पाण्यात पडले. त्यांच्या पाठोपाठ संचेतनहीा पडला. मदतीला कुणीच नसल्याने तिघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेसाठी कारणीभूत ठरलेल्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल झाला. इतरही कायदेशीर सोपस्कर पार पाडले जातील. परंतु ही बालके पुन्हा परत येतील का, हा प्रश्न सर्वांनाच छळत आहे.आई.. खेळायला जातो!सिद्धेश, आदर्श आणि संचेतन ही तिन्ही मुले रविवारी सुट्टी असल्याने सकाळीच घराबाहेर पडले. जाताना प्रत्येकाने आईला सांगितले, ‘आई.. खेळायला जातो.’ आईनेही नेहमीप्रमाणे ‘लवकर ये’ म्हटले असेलच. पण एकदा गेलेले हे तिघेही आलेच नाही. आली ती वाईट वार्ता. सिद्धेश व आदर्शवर पांढरकवड्यात तर संचेतनवर मूळ गाव दिंडाळा ता. उमरखेड येथे अंत्यसंस्कार झाले.
तीन दोस्तांची ‘एक्झिट’ चटका लावून गेली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 21:54 IST
एकमेकांवर जीव ओवाळून टाकणारे ते तीन मित्र... खेळण्यासाठी तिघेही चिमुरडे एकाच वेळी घराबाहेर पडतात... पण मृत्यूचा डोह जणू त्यांची प्रतीक्षा करीत असतो... पाण्याने भरलेल्या डबक्यात मासे पाहण्याचे निमित्त होते... आणि एकापाठोपाठ तिघेही पाण्यात बुडून मरण पावतात.
तीन दोस्तांची ‘एक्झिट’ चटका लावून गेली
ठळक मुद्देशहर हळहळले : दोघांवर पांढरकवडात तर एकावर उमरखेड येथे अंत्यसंस्कार