यवतमाळ : स्वच्छ आणि मुबलक पाणी ग्रामीण भागात उपलब्ध व्हावे यासाठी राबविण्यात आलेल्या राष्ट्रीय पेयजल योजनेलाही भ्रष्टाचाराची कीड लागली आहे. २६ गावातील अर्धवट पाणीपुरवठा योजना गुंडाळण्याचा निर्णय घेण्यापाठोपाठ आता या योजनेत तीन कोटी रुपयांचा अपहार झाल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. यवतमाळ जिल्ह्यात ग्रामीण पाणीपुरवठा योजना सुरळीत कार्यान्वित करण्यासाठी राष्ट्रीय पेयजल योजना राबविण्यात आली. स्वच्छ, शुद्ध आणि कायमस्वरूपी पाणीपुरवठ्यासाठी थेट केंद्र सरकारकडून आर्थिक मदत करण्यात येते. या योजनेवर नियंत्रण ठेवण्यासाठी गावातच ग्रामीण आरोग्य पाणीपुरवठा व स्वच्छता समिती निवडण्यात आली. या समितीची निवड ग्रामसभांमधून करण्यात आली. त्यानंतरही या योजनेमध्ये अपहार झाल्याचे पुढे येत आहे. अनेक वर्षांपासून रखडलेल्या नळ योजनांच्या कामांची पडताळणी करण्यात आली. त्यात हे धक्कादायक वास्तव पुढे आले. २६ गावातील अर्धवट नळ योजना गुंडाळण्याच्या निर्णयानंतर आता तीन कोटी रुपयांचा अपहार झाल्याचे पुढे येत आहे. अनेक ठिकाणी योजनेच्या कामाचा पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात निधी उचलून परस्पर खर्च करण्यात आला. अशा प्रकारे १२ गावातील योजनेच्या अपहारात दोन कोटी ८९ लाख ८८ हजार रुपये अडकले आहे. जिल्ह्यातील या १२ गावांमध्ये २००७ पासून कार्यान्वित केलेल्या नळ योजनेचे अद्यापही काम पूर्ण झाले नाही. आर्णी पंचायत समितीअंतर्गत खेड येथे २० लाख ५५ हजार तर तळणी येथे ४० लाख ८५ हजार रुपयांचा अपहार झाल्याचे पुढे आले. काही ठिकाणी काम न करताच परस्पर निधी खर्च केला. या प्रकरणात जिल्हा परिषदेने त्या गावातील पाणीपुरवठा समित्यांच्या विरोधात थेट फौजदारी तक्रारी दाखल करण्याचे आदेश दिले आहे. गटविकास अधिकाऱ्यांकडून पोलिसात तक्रार देण्यास दिरंगाई केली जात आहे. आता पुन्हा नव्याने निर्देश देण्यात आले आहे. रक्कम वसुलीसाठी थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश आहेत. (कार्यालय प्रतिनिधी)
राष्ट्रीय पेयजलमध्ये तीन कोटींचा अपहार
By admin | Updated: January 8, 2015 23:01 IST