यवतमाळ : शासन दफ्तरी प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी सुमारे दहा दिवसांपासून वनपाल आणि वनरक्षक संपावर गेले आहेत. न्याय्य मागण्यांसाठी संपावर जाणे हा त्यांचा अधिकार आहे. मात्र संप कालावधीत त्यांच्या ऐवजी वनरक्षणाचे काम कुणी करावे, याचे नियोजनच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेले नाही. त्यामुळे यवतमाळ वनवृत्तातील हजारो हेक्टर जंगलाच्या संरक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय लाकूड वाहतूकीची परवानगी मिळत नसल्याने शेतकरीही अडचणीत सापडले आहे. यवतमाळ वनवृत्तातील हिवरी वनपरिक्षेत्रांतर्गत मनपूर बिटमधील राखीव वनात दोनदा शेकडो सागवान वृक्षांची कत्तल करून तस्करीचा प्रयत्न उघड झाला. त्यापाठोपाठ घाटंजी वनपरिक्षेत्रातील साखरा बिटमध्येही ट्रक फसल्याने राखीव वनातील शेकडो सागवान वृक्षांची कत्तल आणि तस्करी उघड झाली. या घटनांची शाई वाळते न् वाळते तोच पुसद वनपरिक्षेत्रातही ट्रक फसल्याने सागवान लाकडांची तस्करी उघड झाली. वनाधिकारी आणि कर्मचारी कर्तव्यावर असताना लाकूड तस्करीच्या एवढ्या गंभीर घटना घडल्या. आता तर एकट्या यवतमाळ वन विभागातील दीडशेवर वनकर्मचारी संपावर गेले आहेत. यवतमाळ वनवृत्तातील संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांचा आकडा तर एक हजारच्या घरात जातो. असे असताना वरिष्ठ स्तराहून जंगल संरक्षणासाठी पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे होते. मात्र तसे न झाल्याने हजारो हेक्टर राखीव जंगल वाऱ्यावर सोडण्यात आले आहे. केवळ वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडून जंगलात गस्त घालण्यात येत आहे. एकटा अधिकारी गस्त घालून करणार काय, असा प्रश्नही निर्माण झाला आहे. संपाच्या कालावधीत सागवान कत्तल आणि तस्करीच्या घटना घडल्यास याची जबाबदारी कुणाची, असा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. अनेक शेतकऱ्यांनी पैशाची तजविज करण्यासाठी परवानगी काढून शेतातील सागवान वृक्षांची तोड केली. मात्र वनपाल आणि वनरक्षक संपावर असल्याने त्यांना वाहतूक पास मिळत नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
हजारो हेक्टर जंगलाची सुरक्षा वाऱ्यावर
By admin | Updated: September 1, 2014 23:56 IST