पुसद : उपविभागातील सिंचन, वन विभाग, स्थानिक स्वराज्य संस्थांचे आॅडिट, नवीन मंजूर पोलीस ठाणे, प्रभारी अधिकारी आदी विविध समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेस व मनसे पदाधिकाऱ्यांनी येथील मुखरे चौकात पुकारलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा बुधवारी तिसरा दिवस होता. या आंदोलनाला शहरातील विविध राजकीय व सामाजिक पाठिंबा दर्शविला असून सध्या आंदोलनकर्त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. अॅड.सचिन नाईक, ज्ञानेश्वर तडसे, अभय गडम, पुंडलिक शिंदे व गजानन राठोड आदींनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाला माजी मंत्री शिवाजीराव मोघे, माजी आमदार विजयराव खडसे आदींसह विविध राजकीय व सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शविला. परंतु जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार वामनराव कासावार यांनी बुधवारी पुसदला भेट देऊनही ते इकडे फिरकले नाही. त्यामुळे काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह नागरिकांमध्ये नाराजीचा सूर दिसून आला. या बाबत आंदोलक आणि काँग्रेसचे अॅड.सचिन नाईक यांना विचारणा केली असता, वामनराव कासावार हे उपोषण मंडपाला भेट देवून समस्या जाणून घेण्यासाठी आले होते. मात्र त्यांनी कुणाच्या सांगण्यावरून ही भेट ऐनवेळी रद्द केली, हे माहीत नसल्याचे म्हटले. परंतु काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये यामुळे नाराजीचे वातावरण दिसून आले, हे मात्र खरे. (प्रतिनिधी)
अन्नत्याग आंदोलनाचा तिसरा दिवस
By admin | Updated: March 26, 2015 02:14 IST