शासनाचा अंदाज : चारा डेपोची अद्याप मागणी नाही, पशुसंवर्धन विभागाची माहितीयवतमाळ : यावर्षी जिल्ह्यात भिषण दुष्काळी परिस्थिती असली तरी पशुपालकांना दिलासादायक बाब म्हणजे जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार २५ जुलै २०१६ पर्यंत पशुंसाठीच्या चाऱ्याची टंचाई भासणार नाही. त्यामुळे यावर्षी सध्या तरी चारा डेपोची मागणी नसल्याचे जिल्हा पशुसंवर्धन कार्यालयाकडून सांगण्यात आले. दुष्काळी परिस्थितीत जनावरांना चारा आणि पाणी पुरविणे हे पशुपालकांसमोर मोठे आव्हान असते. परंतु जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या माहितीनुसार यावर्षी सध्यातरी जिल्ह्यात कुठेही चाराटंचाई नाही. चाऱ्याच्या तुलनेत पशुंसाठी पाण्याची मात्र मागणी आहे. जनावरांना किमान पिण्यासाठी पाणी मिळावे, यासाठी पशुपालकांची चांगलीच कसरत सुरू आहे. पशुंच्या चाऱ्याच्या अनुषंगाने पशुसंवर्धन विभागाकडून १ आॅगस्ट ते ३० जुलै असे एक वर्ष समजण्यात येते. मृगाच्या पावसानंतर एक महिन्यात साधारणत: नवीन चाऱ्याचे उत्पादन येते. यावर्षी तसे न झाल्यास शेवटचे पाच-सहा दिवस मात्र चाऱ्याबाबत गोंधळ निर्माण होऊ शकते. अन्यथा सर्वकाही सामान्य राहिल्यास आणि वेळेवर पाऊस आल्यास चाराटंचाई जाणवणार नसल्याचे पशुसंवर्धनकडून सांगण्यात आले. याबाबत नुकतीच एक बैठक घेण्यात येऊन आढावा घेण्यात आला. या बैठकीत पंचायत समिती, महसूल तसेच पशुसंर्वन विभागाकडे जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यातून चारा डेपोची मागणी नसल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. डी. बी. सोनकुसळे यांनी दिली. मागील वर्षी फारसे समाधानकारक पीक झाले नसले तरी पिकांची ग्रोथ चांगली होती, त्यामुळे चाऱ्याचे बऱ्यापैकी उत्पादन झाले होते. आता हा चारा कामी पडत आहे. जिल्ह्यातील वार्षिक चारा उत्पादनावर नजर टाकली असता जंगल अधिक पडिक जमीन असे एकूण साडेचार हजार हेक्टर चाऱ्याचे उत्पादन होते. एका हेक्टरपासून एक मेट्रिक टन चारा मिळतो. याशिवाय शेतकरी स्वत: आपल्या शेतात जे पीक घेतात त्यातूनही मोठ्या प्रमाणात चाऱ्याचे उत्पादन होते. या सर्व चाऱ्याचा उपयोग जिल्ह्यातील लाखोंच्या संख्येने असलेल्या पशुंच्या वर्षभराच्या संगोपनासाठी केला जातो. (प्रतिनिधी)
जिल्ह्यात चारा टंचाईचा धोका नाही
By admin | Updated: May 5, 2016 02:37 IST