यवतमाळ: पुणे येथून प्रवासी घेऊन चंद्रपूरकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सला दारव्हा मार्गावरील इचोरी घाटात शनिवारी सकाळी ९ वाजता अपघात झाला. चालकाचे वळणावर नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल्स रस्त्याच्या खाली दरीत पलटली. सुदैवाने झाड आडवे असल्याने ट्रॅव्हल्स दरीत कोसळण्यापासून वाचली. या अपघातात ३० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच लाडखेड व यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पलटलेल्या ट्रॅव्हल्सला सरळ करून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, प्रवासी साहित्याबद्दल चिंतित होते. अपघातामुळे प्रवाशांच्या बॅगा व सोबतचे साहित्य अस्ताव्यस्त झाले होते, काहींचे मोबाईलही गहाळ झाले असून त्याचा शोध सुरू होता.