विहिरी कोरड्या : दोन हजार हेक्टर भाजीपालाही धोक्यात यवतमाळ : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दुष्काळी परिस्थिीतून सावरण्यासाठी उन्हाळी पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली. भूईमुगाची तब्बल १५ हजार हेक्टरमध्ये पेरणी केली होती. मात्र आता एप्रिलमध्येच विहिरी व जलाशय कोरडे पडल्याने हे पीक करपायला सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांना खरीप, रबी हंगामानंतर आता उन्हाळ्यातही मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. सोयाबीन, कापूस या पिकांनी मोठी निराशा केली. त्यानंतर हिवाळ्यातील गहू, हरभरा ही पिकेसुद्धा जेमतेमच हातात आली. किमान वर्षभराचा घर खर्च भागेल, इतके तरी उत्पन्न मिळविण्यासाठी आहे त्या पाण्याचे नियोजन करून शेतकऱ्यांनी १७ हजार हेक्टरमध्ये उन्हाळी पिकांची लागवड केली. यात सर्वाधिक भूईमूग, तीळ, भाजीपाला यांचा समावेश आहे. मात्र रणरणत्या उन्हात घाम गाळून फुलविलेली ही पिके आता डोळ्या देखतच करपताना पहावी लागत आहे. शेतातील विहिरींनी तळ गाठला आहे. तर जलाशयही कोरडे पडले आहे. तापमानही ४४ अंशावर पोहोचल्याने आता ही पिके जगविणे शक्य नाही. अनेकांना तर शेतातून भूईमूग उपडून आणण्याचीही सोय राहिलेले नाही. काकडी, टमाटर, भेंडी, पालक, सांभार ही भाजीपाला पिकेही शेतातच करपत आहे. मागील वर्षी उन्हाळ्यात अवकाळी पावसामुळे पिकांना मोठा दिलासा मिळाला होता. यावर्षी पाऊस कमी झाल्याने उन्हाळ्यात एखादा पाऊस येईल या आशेवर शेतकऱ्यांनी हा डाव मांडला होता. एकाएकी तापलेल्या उन्हाने पाण्याची पातळी खोल गेली. कधीही न आटणाऱ्या विहिरी कोरड्या पडल्या आहेत. शेतकऱ्यांनी भूईमूग लागवडीसाठी एका एकारामागे १४ हजार ५०० रुपये गुंतवणूक केली आहे. जिल्हाभरातील शेतकऱ्यांनी तब्बल ५५ कोटी रुपये खर्चून भूईमूग पीक लावले आहे. आता मात्र त्याच्या हाती लागवड खर्चही येणे शक्य नाही. एकरी तीन ते चार क्ंिवटलचे उत्पन्न निघत आहे. मे अखेर काढावा लागणारा भूईमूग पाण्याअभावी एप्रिल महिन्यातच काढला आहे. काहींना केवळ कुटार झाले तर अनेकांना तेही आणता आले नाही. (कार्यालय प्रतिनिधी)
१५ हजार हेक्टर क्षेत्रातील उन्हाळी भूईमूग करपला
By admin | Updated: April 28, 2016 02:17 IST