पुसद : पुसद शहर आणि परिसरातील रस्त्यांची गेल्या काही महिन्यांपासून अक्षरश: चाळणी झाली आहे. अनेक ठिकाणी अगदी रस्त्याच्या मधोमध मोठाले खड्डे पडले असून त्यामध्ये पाणी साचले आहे. परिणामी चालकांसह वाहनांचेही सांधे ढिले होताना दिसत आहे. यामुळे शहरात अपघातांच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. शहरात घराच्या बाहेर पडल्यावर वाहन कसे चालवावे, असा प्रश्न वाहनधारकांना भेडसावत आहे. केवळ अंतर्गतच नव्हे तर शहरातील मुख्य रस्त्यांचीसुद्धा दुरावस्था झाली आहे. वाहनधारकांनी आपले वाहन कितीही काळजीपूर्वक चालविले तरीसुद्धा गड्डे चुकविणे कठीण होते. यामुळेच मग अपघातही होतात. येथील महात्मा फुले चौक ते वसंतराव नाईक चौकादरम्यानचा रस्ता याचे जिवंत उदाहरण आहे. या मार्गावर अनेक रुग्णालय, शाळा, महाविद्यालय व तहसील कार्यालय आहे. त्यामुळे या मार्गावर दिवसभर चांगलीच वर्दळ असते. पंरतु हा रस्ता एवढा खराब झाला आहे की, रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न निर्माण होतो. बांधकाम विभाग व नगरपरिषदेला मात्र या खड्ड्यांचे कोणतेही सोयरसुतक उरले नाही. नगरपरिषदेचे पदाधिकारीसुद्धा आपल्याच राजकारणात खुश आहेत. त्यांचे प्रशासनावर कुठलेही वर्चस्व नाही. तर दुसरीकडे बांधकाम विभाग आपल्या कमिशन पॅटर्नमध्ये गुंतला आहे. सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या समस्यांचे कुणालाही घेणे-देणे उरलेले नाही.पुसद शहराच्या सौंदर्यात भर टाकणारा व फु.ना. ते बा.ना. या आद्याक्षरांवर प्रसिद्ध असलेला तब्बल सात कोटी रुपये खर्चून बांधलेल्या रस्त्याचीही सध्या अवस्था वाईट आहे. या रस्त्यावर हनुमान मंदिराजवळ मोठे खड्डे पडले आहे. त्यामुळे याठिकाणी दुचाकी व आॅटोरिक्षांचे नेहमीच अपघात होतात. याच मार्गावरील नाईक बंगला ते श्रीरामपूर या एक किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरण एप्रिल, मे पासून रखडले आहे. संबंधित कंत्राटदाराचे बिलच मिळाले नसल्याने त्याने काम बंद केल्याची माहिती आहे. ग्रामीण रुग्णालयाचा रस्ताही संपूर्ण खड्डेमय झाला आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तब्बल १२ कोटी रुपये मागील वर्षी देण्याचे मान्य केले होते. त्यातून दोन कोटी गहुली या गावासाठी व दहा कोटी रुपये पुसद शहराच्या विकासासाठी खर्च करण्यात येणार होते. या संदर्भात पुढे मात्र त्याचे काय झाले हे कळायला मार्ग नाही. येथील पुसद-यवतमाळ मार्गावरील पूस नदीच्या पुलावरील संरक्षक कठडे गायब झाले आहे. यामुळे वाहनधारकांना जीव धोक्यात घालून या पुलावरून ये-जा करावी लागते. याबाबत बांधकाम विभागाला संपूर्ण माहिती असून देखील ते त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे या मोठ्या पुलाची दयनीय अवस्था झाली आहे. पुसद ते वाशिम मार्गावर खंडाळा, मोठी मारवाडी व लहान मारवाडी फाट्यावर रस्त्याच्या मधोमध खड्डे पडले आहेत. वाहनधारकांना पावसाळ्यात व रात्रीच्या सुमारास हे खड्डे दिसत नसल्यामुळे अनेकदा अपघाताला सामोरे जावे लागते. परिसरातील नागरिकांसाठी हे सर्वच खड्डे धोकादायक ठरत आहे. याबाबत प्रशासनाला सर्व काही माहीत असताना देखील ते यावर त्वरित कारवाई करण्यास तयार नाही. त्यामुळे सर्वसामान्य पुसदकर आणि तालुक्यातील नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)
पुसदमधील रस्त्यांची चाळणी
By admin | Updated: September 14, 2014 00:12 IST