वणी : खरीप हंगाम जवळ येऊ लागल्याने शेतकर्यांची लगबग सुरू झाली आहे. यावर्षी पाऊस लवकर येण्याचे संकेत प्राप्त झाल्याने बळीराजाने मशागत पूर्ण करण्याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. सोबतच खत आणि बियाण्यांसाठी त्यांची धावाधाव सुरू झाली आहे. वणी तालुक्यात ९२ हजार ३५८ हेक्टर क्षेत्र लागवडीयोग्य आहे. त्यापैकी जवळपास ६० हजार हेक्टरच्यावर क्षेत्रात खरीपाची पेरणी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तालुक्यातील लागवडीयोग्य जमिनीचे क्षेत्रफळ मात्र वर्षागणीक कमी होत आहे. तालुक्यात कोळसा खाणींची संख्या सतत वाढत असल्याने आता लागवडीखालील क्षेत्रात घट होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे उत्पन्नातही फरक पडत आहे. सोबतच उत्पन्नात घटही येत आहे. रस्त्यालगतच्या शेतातील पिकांवर धूळ साचत असल्याने पिकाच्या उतारीत येणारी घट शेतकर्यांसाठी कर्दनकाळ ठरत आहे. यावर्षीचा खरीप हंगाम आता तोंडावर आला आहे़ येत्या २४ मे पासून पावसाचे पहिले नक्षत्र रोहिणी सुरू होत आहे. त्यानंतर ७ जूनपासून पावसाचे मुख्य नक्षत्र मृग सुरू होणार आहे. परिणामी येत्या १५-२0 दिवसानंतर खरीप हंगामाची लगबग खर्या अर्थाने सुरू होणार आहे़ शेतकरी तूर्तास पूर्व तयारीला लागले आहे़ शेताची नांगरणी, वखरणी करण्यात ते गुंग आहे. तालुक्यात जवळपास २६ हजार शेतकरी शेती कसतात. ते आता लग्नसराईकडे दुर्लक्ष करून नांगरणी, वखरणीची कामे करताना दिसत आहे़ शेतात नांगरणी करून वखरणीसह काशा, काडी, कचरा वेचण्याचे काम सुरू आहे़ शेतीची कामे उरकण्यासाठी शेतकरी ट्रॅक्टरच्या साहाय्याने रात्रीसुध्दा नांगरणी, वखरणी करीत असल्याचे दिसून येत आहे. अनेक शेतकर्यांची मशागत आता पूर्णत्वासही गेली आहे. त्यामुळे अशा शेतकर्यांनी आता बियाणे, रासायनिक खताची खरेदी करून साठवण करण्याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. यावर्षी कृषी विक्रेत्यांनी यापूर्वी बियाणे व रासायनिक खतांची मोठ्या प्रमाणात खरेदी करून त्याची साठवणूक केली आहे़ त्यामुळे बियाणे व खतांचा सुकाळ असल्याचे एका कृषी विक्रेत्याने सांगितले़ यावर्षी सोयाबिनचा पेरा पुन्हा वाढण्याची शक्यता आहे़ कापसाला शासन उत्पादन खर्चावर आधारित भाव देत नसल्याने कापसाचा पेरा फायदेशीर ठरत नसल्याची शेतकर्यांची ओरड आहे़ परिणामी शेतकर्यांचा सोयाबीन पेरणीकडे कल वाढला आहे़ कमी खर्चात सोयाबिनचे अधिक उत्पन्न घेता येते. तसेच सिंचनाची सोय असल्यास सोयाबीन पीक काढणीनंतर दुसरे रबी पीकही घेता येते़ त्यामुळे सोयाबीन पीक फायदेशीर असल्याचे शेतकर्यांना वाटत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
खरीप हंगामाची लगबग सुरू
By admin | Updated: May 20, 2014 23:56 IST