रणरणते ऊन्ह : ३७ जागांसाठी तब्बल सहा हजार उमेदवारयवतमाळ : रणरणत्या उन्हात यवतमाळात पोलीस भरतीप्रक्रियेला प्रारंभ झाला असून ३७ जागांसाठी तब्बल सहा हजार ६६ उमेदवार अग्नी परीक्षा देत आहे. या पोलीस भरतीसाठी राज्यभरातील तरुणांचे जत्थे यवतमाळात दाखल झाले असून नोकरीच्या आशेने जीव तोडून बेरोजगार धावत आहे. यवतमाळातील पळसवाडी कॅम्पमधील पोलीस मैदानात पोलीस भरती प्रक्रियेला प्रारंभ झाला. पहाटे ५.३० वाजतापासून या भरतीप्रक्रियेला प्रारंभ होत आहे. यात १०० मीटर धावणे, लांब उडी, गोळा फेक, मुलांसाठी १६०० मीटर, मुलींसाठी ८०० मीटर धावणे अपेक्षित आहे. दररोज ५०० विद्यार्थ्यांची चाचणी येथे घेतली जाणार आहे. तसेच संपूर्ण नियोजन पोलीस खात्याने केले आहे. त्यासाठी ३०० कर्मचारी आणि ५० अधिकारी नियुक्त केले आहे. यवतमाळ, अमरावती, नांदेड, बुलडाणा, अकोला, वर्धा, वाशिम, चंद्रपूरसह विविध ठिकाणचे उमेदवार येथे पोलीस भरतीसाठी आले आहे. पोलीस भरती प्रक्रिया पारदर्शक व्हावी यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून कुठलाही गैरप्रकार होऊ नये म्हणून दररोज अधिकाऱ्यांचे टेबल बदलविले जाणार आहे. भरती प्रक्रियेतील चार बाबी पळसवाडी कॅम्पच्या मैदानावर तर १६०० आणि ८०० मीटर धावण्यासाठी नेहरु स्टेडियमचा वापर करण्यात येणार आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहे. त्यामुळे उन्हाचा तडाखा या उमेदवारांना बसण्याची शक्यता आहे. पहाटेच्या दोन बॅच सोडल्या तर इतर बॅचला उन्हाचा तडाखा बसण्याची दाट शक्यता आहे. (शहर वार्ताहर)
पोलीस भरतीच्या अग्निपरीक्षेला प्रारंभ
By admin | Updated: March 30, 2016 02:40 IST