लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सततच्या पावसाने हाती आलेले पीक मातीमोल झाले. यानंतर राहिलेल्या पिकाला घरात आणण्यासाठी शेतकऱ्यांकडून लगबग सुरू झाली आहे. यातूनच मजुरांसाठी गावामध्ये स्पर्धा झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. याच सुमारास राळेगावमध्ये खासगी खरेदीदाराने कापूस खरेदीचा शुभारंभ केला. विशेष म्हणजे कापसाला पाच हजार १०० रुपये क्विंटलला दर देण्यात आला आहे. सोयाबीन आणि कापूस दोन्ही पिकांचे दर खुल्या बाजारात सारखेच आहेत. यावर्षी अति पावसाने कापूस आणि सोयाबीन या दोन्ही पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. काढणीला आलेले सोयाबीन पावसाने ओलेचिंब झाले. त्याचे मात्रेच शिल्लक राहिले, तर कापसाचे बोंड पावसाने सडले आहेत. हा कापूस मोठ्या प्रमाणात फुटला आहे. सोयाबीन सोंगण्यासाठी मजुरांची आवश्यकता आहे. याच सुमारास पावसाने कापूस मोठ्या प्रमाणात फुटला आहे. त्यालाही मजुराची गरज आहे. दोन्ही ठिकाणी एकाचवेळी मजुराची आवश्यकता निर्माण झाल्याने गावात आणीबाणीची परिस्थिती आहे. मजूर शेतकऱ्यांकडे येण्यासाठी जादा दर मागत आहे. अशा परिस्थितीत शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. गावशिवारात मोजकेच मजूर आहेत. त्यावरच संपूर्ण मदार आहे. पावसाचाही धोका वरून कायम असल्याने शेतकरी संकटात आहे. काढणीला आलेला कापूस खुल्या बाजारात यावर्षी सहा हजार रुपये क्विंटलच्या वर पोहोचेल, असा अंदाज होता. मात्र सध्या पाच हजार १०० रुपये क्विंटल दराने तो खरेदी होत आहे. राळेगावात खासगी जिनिंगमध्ये कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. दुसरीकडे बाजारात सोयाबीन येण्यापूर्वी दहा हजार रुपये क्विंटल दर होता. तो दर आता चार हजार ते पाच हजारापर्यंतच आहे.
पावसाने कापसाची अवस्था अशी झाली आहे. ओलाचिंब कापूस बाजारात येत असल्याने तो वाळवून आणावा, असे खरेदीदार सांगत आहेत. कापूस वाळवून विक्रीसाठी नेल्यानंतर त्याला पाच हजार १०० रुपयांचा दर मिळाला आहे.