पुसदमध्ये आणखी सहा कोरोना पॉझिटिव्ह, रॅपिड टेस्टला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2020 05:00 AM2020-07-12T05:00:00+5:302020-07-12T05:00:25+5:30
तालुक्यातील ३१ जणांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली. त्यापैकी एका ६० वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. १३ नागरिक कोरोनातून बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली. आता एकूण १७ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. शुक्रवारी सायंकाळी एक परिचारिका आणि एका शिक्षकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. शनिवारी आणखी चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : शहर व तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. शुक्रवारी रात्री दोघांचे तर शनिवारी चौघांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्याची एकूण रुग्णसंख्या ३१ वर पोहोचली आहे. यापैकी १७ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहे. यामुळे प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला आहे.
तालुक्यातील ३१ जणांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली. त्यापैकी एका ६० वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. १३ नागरिक कोरोनातून बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली. आता एकूण १७ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. शुक्रवारी सायंकाळी एक परिचारिका आणि एका शिक्षकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. शनिवारी आणखी चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात गढी वॉर्डातीन दोन महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे. त्यांच्या स्वॅबची तपासणी येथेच रॅपिड टेस्टमार्फत करण्यात आल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.आशीष पवार यांनी सांगितले.
शुक्रवारी क्वारंटाईन असलेल्या ५२ जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले. तत्पूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या केंद्रप्रमुखाच्या संपर्कातील ५९ जणांना क्वारंटाईन केले होते. दररोज रुग्णसंख्येत भर पडत असल्याने प्रशासन व आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
रुग्णांची संख्या वाढत असल्याने येथील आयुर्वेद महाविद्यालयाच्या डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये ‘रॅपिड टेस्ट’ला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे मोतीनगरमधील कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या एका डॉक्टरच्या संपर्कातील क्वारंटाईन असलेल्या ३० जणांची रॅपिड टेस्ट येथेच केली जाणार आहे. त्यांची टेस्ट निगेटिव्ह आल्यास त्यांना सुटी दिली जाणार असल्याचे डॉ.आशीष पवार यांनी सांगितले.
जनता कर्फ्यूबाबत अद्याप निर्णय नाही
रुग्णसंख्या वाढत असल्याने शुक्रवारी आमदार इंद्रनील नाईक, आमदार अॅड.नीलय नाईक, आमदार डॉ.वजाहत मिर्झा आदींच्या उपस्थितीत सर्वपक्षीय व विविध संघटनांची बैठक झाली. मात्र त्यात कोणताही निर्णय झाला नाही. उपस्थितांनी जनता कर्फ्यूबाबतचा निर्णय प्रशासनावर सोपविला आहे. अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याचे एसडीओ डॉ.व्यंकट राठोड यांनी सांगितले.