लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : नाफेडने खरेदीची ऑनलाइन साइट अचानक बंद केल्याने हरभरा उत्पादक अडचणीत आला आहे. नाफेडच्या भरवशावर साठवून ठेवलेल्या हरभऱ्याला बुरशी चढत असल्याने मोठे नुकसान होण्याची भीती आहे. ऐन खरिपाच्या तोंडावर नाफेडने घेतलेल्या या निर्णयामुळे बळीराजा कमालीचा अडचणीत आला आहे. नाफेडने १४ मार्च रोजी हरभऱ्याची खरेदी सुरू केली. उमरखेड परिसरातील एक हजार ९३० हरभरा उत्पादकांनी ऑनलाइन चणा विक्रीची प्रक्रिया पूर्ण केली. २४ मेपर्यंत खरेदी-विक्री संघाने परिस्थितीनुसार एक हजार शेतकऱ्यांना तोलाई संदेश दिला. या तारखेपर्यंत एक हजार शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी केला. मात्र ९३० हरभरा उत्पादकांचा माल खरेदी करण्यात आला नाही. आता त्यांनी घरात साठवून ठेवलेल्या हरभऱ्याला बुरशी चढत आहे. खरीप हंगाम तोंडावर आला आहे. बी-बियाणांचे बजेट हरभरा विक्रीवर अवलंबून होते. मात्र अचानक झालेल्या बंदच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना पैशाची जुळवाजुळव करण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे. नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी करण्यात यावा, अशी मागणी त्यांच्याकडून केली जात आहे.
२९ मेपूर्वीच क्लोज- नाफेडने ज्या ठिकाणी तोलाई एजन्सी निवडली होती, त्या एजन्सीला २९ मेपर्यंत खरेदीबाबत कळविले होते. परंतु नाफेडने अचानक ऑनलाइन साइट बंद करून गोंधळ उडवून देत शेतकऱ्यांपुढे अडचणींचा डोंगर उभा केला आहे.
नाफेडकडून २९ मे रोजीपर्यंतच चणा खरेदी सुरू ठेवावी, असा पत्रव्यवहार झाला होता. मात्र अचानक चार दिवस आधीच साइट बंद करण्यात आली. सोबतच अहवालही मागविला आहे. झालेल्या खरेदीची माहिती पाठविण्याची तयारी सुरू आहे. - विजय मानेसचिव, खरेदी-विक्री संघ, उमरखेड