पीककर्ज : शासन आदेशाची केली पायमल्ली यवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रशासनाने शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप करण्यास असमर्थता दर्शविली. जिल्हा बँक संचालक मंडळ आणि प्रशासन पीककर्ज देत नसल्याने शेतकरी आत्महत्या करीत असल्याचा आरोप करत मंगळवारी सायंकाळी शिवसैनिकांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विश्वास नांदेकर यांनी शिवसैनिकांसह जिल्हा मध्यवर्ती बँकेत जाऊन उपव्यवस्थापकांपुढे तीन मागण्या ठेवल्या. बँकेने नवीन सभासद करून पीककर्ज वाटप करावे, कर्ज थकीत असलेल्या जुन्या सर्व सभासदांच्या पीककर्जाचे पुनर्गठण करावे, बँकेने आजपर्यंत भाग भांडवलाची जमा केलेली रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, अशी मागणी केली. यावर बँकेच्या उपव्यवस्थापकांनी पीककर्ज वाटप करणे शक्य नसल्याचे लेखी उत्तर दिले. बँकेकडून शासनाच्या १४ जानेवारीच्या आदेशाची पायमल्ली केली जात आहे. शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळ सभागृहात पीककर्ज वाटप न करणाऱ्या बँकेवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले. याचाच आधार घेऊन शिवसैनिकांनी जिल्हा बँक प्रशासनाने शेतकऱ्यांना पीककर्ज न देऊन कर्तव्यात कसूर केला, तसेच शेतकऱ्यांना आत्महत्येस प्रवृत्त केले, अशी तक्रार शहर पोलीस ठाण्यात दिली. हा अर्ज वरिष्ठांकडे पाठवणार असल्याचे ठाणेदार मुकुंद कुळकर्णी यांनी सांगितले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष ढवळे, निवासी उपजिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड, उमाकांत पापीनवार, गजानन डोमाळे, श्रीधर मोहोड, अभय सोमलकर, चंद्रकांत घुग्गुल, गजानन किन्हेकार, गणपत लेडांगे, प्रवीण शिंदे महिला आघाडीच्या जिल्हा संघटक लता चंदेल आदींसह अनेक शिवसैनिक उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)
जिल्हा बँकेविरुद्ध शिवसैनिकांची तक्रार
By admin | Updated: July 22, 2015 00:23 IST