लोकमत न्यूज नेटवर्कवणी : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मागील काही दिवसांपासून आपल्या गलथान कारभारामुळे चांगलीच चर्चेत आहे. या बाजार समितीत व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची अक्षरशः लूट होत आहे. व्यापारीधार्जिण्या बाजार समितीने व्यापाऱ्यांना धान्य ठेवण्यासाठी शेड दिले. मात्र, शेतकऱ्यांचे धान्य उघड्यावर आहे.गुरुवारी सायंकाळी शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी अचानक बंद करण्यात आल्याचे कळताच, मनसे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी गुरुवारी सायंकाळी बाजार समितीत जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकल्या. त्यानंतर त्यांनी बाजार समितीतील समस्यांचा पाढाच वाचला. केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या एमएसपीनुसार खरेदी न करता व्यापारी थेट विक्रेत्यांना फोन करून मालाचा भाव ठरवीत असल्याचे यावेळी निदर्शनास आले. तसेच आर्थिकदृष्ट्या अत्यंत सक्षम समजल्या जाणाऱ्या वणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्याचा माल उघड्यावर खरेदी केला जातो. तर, व्यापाऱ्यांच्या मालासाठी शेड दिले जाते, अशी माहिती या ठिकाणी मिळाली. शेतकऱ्यांनी माल उतरविल्यानंतर त्यांच्या मालाचा भाव ठरविला जात असल्याचा आरोप राजू उंबरकर यांनी केला आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांच्या जिवावर उठली की काय, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. हा प्रकार तातडीने बंद करा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांच्या गुलामगिरीतून सोडविण्यासाठी बाजार समित्यांची स्थापना झाली. परंतु वणी बाजार समितीत उलटाच कारभार सुरू आहे. मनसेतर्फे हिंगणघाट बाजार समितीत एकदिवसीय अभ्यास दौरा आयोजित करणार असून, खरेदी प्रक्रियेतील बारकावे शेतकऱ्यांना समजावे याकरिता हा अभ्यास दौरा असणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांमध्ये जागृती केली जाईल. - राजू उंबरकर, राज्य उपाध्यक्ष, मनसे.