यवतमाळ : नगरपरिषदेच्या हद्दवाढीची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. त्यासाठी लगतच्या ग्रामपंचायतींकडून आक्षेप मागविण्यात आले आहे. आक्षेप घेण्यासाठी शेवटचे दोन दिवस उरले असताना आतापर्यंत सात आक्षेप घेण्यात आले आहे. २५ एप्रिल ही आक्षेप घेण्याची मुदत संपल्यानंतर त्यावर लगेचच सुनावणी होणार आहे. शहराच्या विस्तारासाठी आणि नगरपरिषद क्षेत्रावर असलेला दबाव कमी करण्यात करिता नगरपरिषद क्षेत्राचा विस्तार केला जात आहे. यामध्ये शहरालगतच्या अकरा ग्रामपंचायती समाविष्ठ केल्या जाणार आहे. यासाठीच ग्रामपंचायत क्षेत्रातून आक्षेप मागविण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त आक्षेपापैकी बहुतांश आक्षेप हे राजकीय व्यक्तींकडूनच अथवा ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांकडून घेण्यात आले आहेत. लोहारा, उमरसरा, भोसा, गोदणी, डोर्ली, मोहा फाटा परिसरातील पहूर पुर्नवसन येथील ग्रामंचायत सदस्य व काही नागरिकांनी नगरपरिषद हद्दवाढीवर आक्षेप घेतला आहे. लोहारा येथून संगीता पारधी, संतोष पारधी, भिकाजी गायकी, निलेश बेलोरकर यांनी आक्षेप घेतला आहे. उमरसरा येथून भारती राजू इंगोले यांचा आक्षेप, डोर्ली येथून श्याम जयस्वाल, भोसा येथून कविता कोरचे, मिना जीवने, फारूक शेख यांनी आक्षेप घेतला आहे. नगरपरिषद हद्दवाढीची घोषणा एक मे रोजी होणार असल्याने त्यापूर्वीच आलेले आक्षेप सुनावणीतून निकाली काढण्यात येणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
नगरपरिषद हद्दवाढीवर सात आक्षेप
By admin | Updated: April 24, 2015 01:13 IST