कृषी सप्ताह : पीक पद्धती, शासकीय योजनांची थेट माहितीदारव्हा : कृषी सप्ताहादरम्यान अमरावती विभागीय दौऱ्याच्या माध्यमातून कृषी संचालक के.व्ही. देशमुख यांनी दारव्हा तालुक्यातील शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. तालुक्यातील शेतकरी गट प्रमुख, शेतकरी मित्रांना विविध योजनेबाबत मार्गदर्शन केले. माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीदिनापासून राज्यात कृषी विभागामार्फत कृषी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. याचा एक भाग म्हणून राज्याचे कृषी विस्तार व प्रशिक्षण संचालक के.व्ही. देशमुख यांनी दौऱ्यात दारव्हा कृषीविभागाच्या कार्यालयात शेतकरी मित्र, शेतकरी गटाचे प्रमुख यांना मार्गदर्शन केले. यात कृषी विस्तारात शेतकरी मित्राचे महत्व, शेतकरी गटांनी मिळून उत्पादक कंपनी तयार करणे, गटांचे बळकटीकरण करणे आदींबाबत विस्तृत माहिती दिली. उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केलेल्या प्रश्नांना यथोचित उत्तरे देऊन शंकांचे निरसन केले. यावेळी तालुका कृषी अधिकारी पुरूषोत्तम अनगाईत, आत्मा समिती अध्यक्ष विवेक ठाकरे, मंडळ कृषी अधिकारी प्रभाकर राठोड, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक जीवन जाधव, कृषी पर्यवेक्षक बबन इंझाळकर, शेतकरी मित्र बबनराव हागे, पुरस्कार प्राप्त शेतकरी श्रीराम ठाकरे, शाम गावंडे, प्रवीण गायकी, जनुसिंग राठोड, संतोष ढोके व तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते. कृषी विभागाच्या योजना शेतात राबणाऱ्या कष्टकऱ्यांना माहितीच होत नाही. केवळ अनुदान लाटणारे पुढारीच या योजनांचा लाभ घेतात. खऱ्या अर्थाने गरजुंपर्यंत योजना पोहोचविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. (प्रतिनिधी)
ंकृषी संचालकांचा शेतकऱ्यांशी संवाद
By admin | Updated: July 8, 2015 00:08 IST