यवतमाळ : शेतकऱ्यांच्या कर्जाचे तत्काळ पुनर्गठण करा, अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा द्या अशा विविध मागण्यांसाठी काँग्रेसच्या नेतृत्वात सोमवारी जिल्हा कचेरीवर धडक देण्यात आली. जिल्ह्यातील अनेक शेतकरी या रुमणे मोर्चात सहभागी झाले होते. आंदोलकांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस सरकारच्या धोरणा विरोधात नारेबाजी करण्यात आली.स्थानिक पोस्टल ग्राउंडवरून शेतकऱ्यांचा रूमणे मोर्चा निघाला. यावेळी शेतकऱ्यांना हातात रूमणे घेऊन सरकारच्या विरोधात नारेबाजी करण्यात आली. विविध मार्गाने मार्गक्रमण करीत शेतकऱ्यांचा मोर्चा जिल्हा कचेरीवर धडकला. यावेळी मार्चाचे सभेत रुपांतर झाले. शेतकऱ्यांनी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. यामध्ये मध्यवर्ती सहकारी बँकेने तत्काळ कर्ज पुनर्गठण करावे. नवीन खातेदारांना तत्काळ कर्ज द्या. शेअर्सची रक्कम शेतकऱ्यांना तत्काळ द्या. दुबार पेरणीसाठी हेक्टरी २५ हजार रूपयांची मदत द्या. गारपीटग्रस्त तालुक्यात यवतमाळचा समावेश करा. यासह विविध मागण्यांचा यामध्ये समावेश होता. यावेळी आमदार माणिकराव ठाकरे, कार्याध्यक्ष तातू देशमुख, माजी आमदार विजयाताई धोटे, माजी आमदार नंदिनी पारवेकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, नरेंद्र ठाकरे, राहुल ठाकरे, विजया सांगळे, सिकंदर शाह, देवानंद पवार, सचिन नाईक, अनिल गायकवाड, घनश्याम अत्रे, मनोज जयस्वाल, प्रदीप डंभारे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. (शहर वार्ताहर)
काँग्रेसचा कचेरीवर रुमणे मोर्चा
By admin | Updated: August 11, 2015 02:50 IST