मारेगाव : तालुक्यातील वीज वितरण कंपनीचे रोहित्र फोडून त्यातील तांब्याची तार लंपास करणारी टोळी पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. तालुक्यात गेल्या पाच-सहा वर्षांपासून रोहित्र फोडण्याच्या घटनांचा शोध लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे़गेल्या पाच-सात वर्षांपासून तालुक्यातील वीज कंपनीचे रोहित्र फोडून त्यातील तांब्याची तार चोरून नेण्याच्या घटना वारंवार घडत होत्या़ रोहित्रासोबतच खांबांवरील अॅल्युमिनीअमचे तारसुद्धा चोरीला जात होते़ परंतु चोरटे सर्व माल लगतच्या राज्यात नेऊन विकत असल्याने आणि चोरट्यांचे राज्यात मोठे जाळे असल्याने ते पोलिसांच्या हाती लागत नव्हते़ मारेगाव पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या आंबेझरी येथे गेल्या ३ सप्टेंबरला रोहित्र फोडल्याची घटना घडली़ तक्रार प्राप्त होताच ठाणेदार उमेश पाटील यांनी खास पथक तयार करून अवघ्या तीन दिवसात या टोळीच्या म्होरक्याला जेरबंद करण्यात यश मिळविले़ अटक करण्यात आलेल्यांमध्ये सैय्यद रमजान सैय्यद गुलाम (२७), सैय्यद सद्दाम सैय्यद उस्मान (१९), जितेश महादेव डहाके (२२), रा़ सर्व वणी यांचा समावेश आहे़ आरोपींनी मारेगाव तालुक्यासह पांढरकवडा तालुक्यातही अशा प्रकारच्या चोरीच्या घटना केल्याची कबुली दिली आहे़ या चोरट्यांचे जाळे राज्य व राज्याबाहेर पसरले असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. यातून अनेक चोरीच्या घटना उघड होण्याची शक्यता आहे़ तीनही आरोपींना न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या तीन दिवसात चोरट्यांकडून बरीच माहिती बाहेर येण्याची शक्यता आहे़ या प्रकरणाचा तपास ठाणेदार उमेश पाटील, सहाय्यक ठाणेदार मंगेश भोयर, हवालदार मनोज बोडलकर, अब्दुल नईम शेख, सचिन मरकाम, सुहास मंदावार, शमशुद्दीन मलनस करीत आहे़ (शहर प्रतिनिधी)
रोहित्राची चोरी करणारी टोळी जेरबंद
By admin | Updated: September 11, 2014 23:52 IST