पुनवट : ग्राम उदय ते भारत उदय, अभियानांतर्गत येथे रविवारी विशेष ग्रामसभा घेण्यात आली. १५ ते २४ एप्रिल दरम्यान ‘ग्राम उदय ते भारत उदय’ अभियानाअंतर्गत किसान ग्रामसभा, विशेष ग्रामसभेमधून शासकीय योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष अभियान राबविण्यात आले. त्याअंतर्गत पुनवट येथ विशेष ग्रामसभा घेण्यात आली. सरपंच रक्षणा गजभिये अध्यक्षस्थानी होत्या. ग्रामसभेत केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विनय ठमके यांनीही मार्गदर्शन केले. या विशेष ग्रामसभेला जिल्हा परिषद सदस्य उमा पिदूरकर, पंचायत समिती सदस्य शरद ठाकरे, दिनकर पावडे, विजय पिदूरकर, ग्रामपंचायत पदाधिकारी, गटविकास अधिकारी एन.टी.खेरे, सहाय्यक गटविकास अधिकारी अशोक इंगोले, विस्तार अधिकारी डी.डी.कोसे, विस्तार अधिकारी वामन मेश्राम उपस्थित होते. संचालन देवेंद्र बच्चेवार यांनी केले. कार्यक्रमाला गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)
पुनवट येथे विशेष ग्रामसभेला ग्रामस्थांचा प्रतिसाद
By admin | Updated: April 28, 2016 02:21 IST