यवतमाळ : जिल्ह्यातील पांढरकवडा, वणी आणि दारव्हा या तीन ठाणेदारांवर अकार्यक्षमतेचा ठपका ठेवत त्यांना माघारी बोलविण्याचे आदेश पोलीस प्रशासनाने दिले होते. त्यासाठी त्यांना विनंती अर्जही मागितले गेले होते. परंतु या ठाणेदारांनी परत येण्यास नकार दिल्याचे सांगितले जाते. दोन दिवसांपूर्वी गणेशोत्सवाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक बिपीन बिहारी यांनी बैठक घेतली. या बैठकीमध्ये काही पोलीस अधिकाऱ्यांची झाडाझडती घेण्यात आली. वणी, पांढरकवडा व दारव्हा ठाणेदाराच्या कार्यप्रणालीवर नापसंती व्यक्त करून त्यांना परत बोलविण्याचे आदेश प्रशासनाला दिले. त्यानुसार या ठाणेदारांना विनंती अर्ज पाठविण्याच्या सूचनाही केल्या गेल्याचे सांगितले जाते. मात्र या ठाणेदारांनी पुन्हा आपल्या गॉडफादरकडे धाव घेत विनंती अर्ज देण्यास नकार दिला. काहींनी तर वेळप्रसंगी ‘मॅट’मध्ये (महाराष्ट्र प्रशासकीय लवाद) जाण्याची तयारीही दर्शविली. वणी ठाणेदाराने पुन्हा ‘सेंटर पॉर्इंट’चा मार्ग निवडल्याचे बोलले जाते. महानिरीक्षकांनी तीन ठाणेदारांना परत बोलविण्याचे आदेश दिल्यानंतर जिल्ह्यातील काही उत्साही पोलीस अधिकाऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. या संभाव्य रिक्त होणाऱ्या ठाण्यांसाठी काहींनी मोर्चेबांधणीही चालविली होती. (जिल्हा प्रतिनिधी)
तीन ठाणेदारांचा परत येण्यास नकार
By admin | Updated: August 23, 2014 02:09 IST