सचिंद्र प्रताप सिंह : जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीची सभा, विकास कामांतील भ्रष्टाचारयवतमाळ : शासनाच्या विविध विकास कामात अपहार झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधीतांकडून अपहाराची रक्कम वसूल करून सोबतच गुन्हेही दाखल करा, अशा सुचना जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी भ्रष्टाचार निर्मुलन समितीच्या सभेत दिली. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, अप्पर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, जलसंपदाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र्र काटपल्लीवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर विकास कामे केली जातात. या कामांमध्ये कंत्राटदारांसह शासकीय व्यक्तीही अपहार करत असल्याचे निदर्शनास आले आहे. काही ठिकाणी सरपंच, ग्रामसेवक हेही अपहारात सहभागी असतात. शासनाची विकास कामे गुणवत्तापुर्वक आणि ठरल्याप्रमाणे होणे आवश्यक आहे. अशी कामे झाली नसल्याचे निदर्शनास आल्यास संबंधीतांकडून व्याजासह अपहारातील सर्व रक्कम वसूल करा. बरेचदा रक्कम वसूल झाल्यानंतर गुन्हे दाखल करण्याचे टाळल्या जाते. आता थेट संबधीतावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. बैठकीत भ्रष्टाचाराची एकूण आठ प्रकरणे चर्चेला आली. त्यातील पहिले प्रकरण दारव्हा तालुक्यातील महागाव कसबा येथील रोहयोअंतर्गत सिमेंट बंधारा, पुरसंरक्षक भिंत आणि अंतर्गत रस्ते, वृक्ष लागवड, नाला सरळीकरणाच्या कामातील भ्रष्टाचाराचे होते. सदर भ्रष्टाचार चौकशीनंतर सिध्द झाल्याने गावातील तत्कालीन ग्रामसेवक व सरपंचावर तातडीने गुन्हे दाखल करण्याचे सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या. आर्णी तालुक्यातील नालासरळीकरण व बोगस मजूर दाखवून केलेल्या भ्रष्टाचारात सरपंच व ग्रामसेविकेविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आले असून तत्कालीन बिडीओ व शाखा अभियंत्यास स्पष्टीकरण मागविण्यात आले आहे.उमरखेड तालुक्यातील दराटी येथील राष्ट्रीय ग्रामिण पेयजलच्या नळयोजना, घाटंजी तालुक्यातील भांबोरा येथील हरियाली योजनेच्या भ्रष्टाचार प्रकरणातही तातडीने गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. उमरखेड तालुक्यातील आठमुर्डी व एकबुर्जी येथील सिमेंट नाला व शेततळ्याच्या कामाची चौकशी जलसंपदा विभागाकडून करण्याच्या सुचना केल्या आहेत. (कार्यालय प्रतिनिधी) भ्रष्टाचार आढळल्यास पुराव्यानिशी तक्रार नोंदवाजिल्ह्यात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर विकासाची कामे सुरु आहे. या कामांमध्ये भ्रष्टाचार झाला असल्याचे आढळून आल्यास नागरिकांनी पुराव्यानिशी तक्रारी लोकशाही दिनात दहा दिवसापुर्वी अर्ज सादर करून दाखल कराव्या, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले आहे.
अपहारातील निधीची वसुली करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करा
By admin | Updated: June 2, 2015 23:58 IST