आयातीचा परिणाम : भावात पाच हजारांची घट यवतमाळ : दुष्काळी परिस्थितीने तुरीचे उत्पादन घटले. यातून तुरीचे दर यावर्षी पुन्हा वधारणार होते. गतवर्षीचा अनुभव लक्षात घेत केंद्र शासनाने यावर्षी तूरडाळ आयात करण्याचा निर्णय घेतला. आयात करण्यात आलेली डाळ देशात दाखल होण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. याचा परिणाम थेट स्थानिक बाजारपेठेवर झाला आहे. तुरीचे दर घसरले आहेत. तीन महिन्यात तुरीच्या दरात क्विंटलमागे पाच हजार रूपयांची घसरण नोंदविण्यात आली आहे.देशभरात ४० लाख मेट्रीक टनापेक्षा अधिक तूरडाळ आयात करण्याचे टेंडर खुले करण्यात आले होते. फेबु्रवारीचा शेवटचा आठवडा आणि मार्चच्या पहिल्या ते दुसऱ्या आठवड्यापर्यंत ही तूरडाळ टप्प्या टप्प्याने दाखल होणार आहे. स्थानिक डाळीच्या तुुलनेत या तूर डाळेचे दर स्वस्त आहेत. यामुळे बाजारात स्थानिक तूर डाळीची मागणी घटण्यास सुरवात झाली आहे.खुल्या बाजारात तुरीची मागणी असली तरी स्थानिक डाळीच्या तुुलनेत स्वस्त दराने सध्या विदेशी डाळ वाढण्याची शक्यता वाढली आहे. या स्पर्धेचा थेट फटका शेतकऱ्यांना सोसावा लागणार आहे. बाजारात विक्रीसाठी आलेली तूर विदेशी बाजाराच्या तुलनेत महाग पडत असल्याने तुरीचे दर घसरले आहेत. यवतमाळ जिल्ह्यात तुरीचे हे दर ७५०० रूपये क्विंटलपर्यंत खाली आहेत. तर हिंगणघाटला हे दर ५५५५ रूपये क्विंटलपर्यंत खाली आले आहेत. यामुळे शेतकरी चांगलाच अडचणीत आला आहे. तुरीच्या सतत घसरणाऱ्या किमतीने शेतकरी हवालदिल झाला आहे. मात्र, अशा अडचणीच्या काळात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संरक्षण देणारी यंत्रणा निद्रिस्त असल्याचे दिसून येत आहे. (शहर वार्ताहर)
तुरीचे दर घसरले शेतकरी हादरला
By admin | Updated: February 24, 2016 02:43 IST