संगीता कपाडिया : सांसद आदर्शग्राम भारीच्या पाहणीनंतर संवादयवतमाळ : लोकांकडे स्वत:च सोल्यूशन घेऊन जाण्यापेक्षा त्यांच्या समस्या त्यांच्या लक्षात आणून देणे महत्त्वाचे आहे. एकदा समस्या लक्षात आली की, लोक स्वत:च आपल्या समस्यांची उत्तरे शोधून काढतात. आणि ती उत्तरे अधिक प्रभावीही ठरतात, असे मत शिक्षणतज्ज्ञ संगीता कपाडिया यांनी व्यक्त केले. सांसद आदर्शग्राम भारी (ता.यवतमाळ) येथे त्यांनी नुकतीच भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी ‘लोकमत’शी विविध विषयांवर संवाद साधला. रेनी सायन्स एज्युकेशन कंपनीच्या माध्यमातून संगीता कपाडिया यांनी शिक्षणक्षेत्रात भरीव कामगिरी केलेली आहे. शिक्षण आणि पर्यावरण या दोन मुद्यांवर त्यांचे काम केंद्रित आहे. पाणी, ऊर्जा आणि जीवजंतू संगोपन हे त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत. पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमधील ९ गावांमध्ये सध्या त्यांचे काम सुरू आहे. तसेच मुंबईतील मागास भागांमध्येही महापालिकेसोबत शैक्षणिक विकासाकरिता त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. खासदार विजय दर्डा यांनी दत्तक घेतलेल्या यवतमाळजवळील भारी गावाला त्यांनी भेट दिली. येथील शिक्षणविषयक परिस्थिती जाणून घेतल्यावर दोन दिवस कपाडिया यांनी कार्यशाळा घेतली. पालक-विद्यार्थ्यांना ग्राहकाची ‘ट्रिटमेंट’भारीतील कार्यशाळेच्या निमित्ताने संगीता कपाडिया यांनी ‘लोकमत’ला विशेष मुलाखत दिली. त्या म्हणाल्या, आज विविध शिक्षणसंस्था पालक आणि विद्यार्थ्यांना ग्राहक म्हणून ‘ट्रिट’ करीत आहेत. पालकही चुकीच्या शिक्षणाचीच मागणी करीत आहेत. मुलांची गुणपत्रिका आणि पर्सेंटेज यावरच पालक अतिरेकी भर देत आहेत. शिक्षणाचे मूळ उद्दिष्ट काय आहे, याकडे फारसे कुणी लक्ष देताना दिसत नाही. केवळ एखाद्या सिलॅबसची कॉपी करून रट्टा पद्धतीने शिक्षण देण्याचे प्रयत्न होत आहेत, अशी खंत कपाडिया यांनी व्यक्त केली. वास्तविक, विद्यार्थ्यांची क्षमता ओळखून त्याला त्या पद्धतीचे शिक्षण दिले जावे. वर्गात काय शिकविले जाते यापेक्षा शिकविलेले विद्यार्थ्याला समजले किती, याचे मूल्यमापन होण्याची गरज आहे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.पुस्तकी ज्ञानापेक्षा विद्यार्थ्यांची सक्षमता महत्त्वाचीविद्यार्थ्यांबाबत बोलताना कपाडिया म्हणाल्या, भारतात ज्ञानाची अजिबात कमतरता नाही. ज्ञान मिळविण्यासाठी केवळ शाळेतच जावे लागते, अशातला भाग नाही. २१ व्या शतकात ज्ञान सर्वत्र उपलब्ध आहे. केवळ पुस्तकी ज्ञानापेक्षा विद्यार्थ्यांना सक्षम करणे महत्त्वाचे आहे. समस्या सोडविण्याची क्षमता, क्रियाशिलता, माध्यमांची साक्षरता व कोलॅबरेशन (एकत्रीकरण) या क्षमता विद्यार्थ्यांमध्ये विकसित केल्यास ते स्वत:च ज्ञान आत्मसात करतात.कारकुनी कामातच शिक्षक व्यस्तसंगीता कपाडिया यांनी सध्याच्या शिक्षकांबाबतही रोखठोक मत व्यक्त केले. त्या म्हणाल्या, आजचा शिक्षक अध्यापनापेक्षा कारकुनी कामातच अधिक राहतो. अध्यापनकौशल्य वाढविण्यासाठी प्रशिक्षणाचा अभाव आहे. जिल्हा परिषदांच्या शाळा असो की खासगी संस्थांच्या; आजही बरेच शिक्षक पुरेसे सक्षम नाहीत. त्यामुळे मुलांचे नुकसान होत आहे. यावर उपाय म्हणजे, विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी सक्षम केले पाहिजे. त्यादृष्टीने ‘एनसीआरटीई’चा कृतीशील शिक्षणाचा अभ्यासक्रम योग्य आहे. पण त्याची अमलबजावणी चुकीच्या पद्धतीने होत आहे. अजूनही तो अभ्यासक्रम अनेकांना समजलेलाच नाही. डिजिटल शाळांचा प्रयोग उत्तम आहे. पण त्यातून मुलांपुढे नेमके काय मांडायचे आहे, हे शिक्षकांना स्पष्ट कळले पाहिजे. मुलांना हसतखेळत शिक्षण मिळाले पाहिजे, यासाठीच आमचे काम सुरू आहे, असे संगीता कपाडिया म्हणाल्या.मानवी तंत्रज्ञान घातकही ठरू शकते पर्यावरणाच्या क्षेत्रातही संगीता कपाडिया यांचे काम उल्लेखनीय आहे. त्यादृष्टीनेच त्यांनी भारी गावाची पाहणी केली. पर्यावरणाबाबत त्या म्हणाल्या, निसर्गाचे स्वत:चे असे खास तंत्रज्ञान असते. त्याचा वापर करूनच आपण चांगले काम करू शकतो. माणसाने स्वत:चे तंत्रज्ञान विकसित केले, हे खरे. मात्र, बऱ्याचदा हे मानवी तंत्रज्ञान घातक ठरते. त्यामुळे निसर्गाच्या तंत्रज्ञानाला छेद न देताच आपल्याला पुढे जावे लागेल. कोणतेही तंत्रज्ञान निसर्गाशी निगडित, टिकावू, हानिकारक नसलेले, दिसण्यास सुंदर आणि उपयोगात येणारे असावे, अशी अपेक्षा कपाडिया यांनी व्यक्त केली. (स्थानिक प्रतिनिधी)भारी गावात कार्यशाळाखासदार विजय दर्डा यांनी दत्तक घेतलेल्या भारी गावात शिक्षणतज्ज्ञ संगीता कपाडिया यांनी कार्यशाळा घेतली. गावाविषयी काय वाटते, गावात कोणती विकासकामे झाली पाहिजे, याबाबतच्या मुलांच्या प्रतिक्रियाही त्यांनी जाणून घेतल्या. अनेक मुलांनी गावात स्वच्छतेची गरज मांडली. खेळण्यासाठी मैदान झाले पाहिजे, गावात दारूबंदी झाली पाहिजे, अशी अपेक्षा मुलांनी यावेळी व्यक्त केली. संगीता कपाडिया यांनी कार्यशाळेत प्लास्टिक निर्मूलनाची व्हिडिओ क्लिप गावकऱ्यांना दाखविली. त्यातून गावातील समस्या गावकऱ्यांच्या लक्षात आली. लगेच दुसऱ्या दिवशी गावात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. महिलांनी गावात स्वच्छता समिती स्थापन केली. प्लास्टिकचे दुष्परिणाम टाळण्यासाठी गावात नियोजन करण्यात आले. गावकऱ्यांनी स्वत:हून जबाबदारी घेतली. संगीता कपाडिया यांच्या कार्यशाळेमुळे समस्येकडे पाहण्याचा गावकऱ्यांचा दृष्टिकोन बदलला.
समस्या समजली की उत्तरे सापडतात
By admin | Updated: May 14, 2016 02:21 IST