झरी : झरीजामणी या आदिवासीबहुल तालुक्यातील पांढरकवडा वन परीक्षेत्रांतर्गत येणाऱ्या पाचपोहर वन वर्तुळातील निमणी येथील वन विभागाचा नाका ओसाड पडला आहे. तेथे आता कुणीच राहात नसल्याने जंगलातील वनसंपदा धोक्यात सापडली आहे.झरीजामणी हा आदिवासीबहुल तालुका वनसंपत्तीने नटलेला आहे. या तालुक्यातील अनेक गावांच्या सभोवताल जंगल आहे. या जंगल परिसरातील काही ग्रामस्थांनी वन विभगाच्या जमिनीवर अतिक्रमणही केले आहे. त्यासाठी जंगल तोड करण्यात आली आहे. जंगल परिसरातील काही ग्रामस्थ भल्या पहाटे उठून जंगलातील वनसंपदा नष्ट करतात. निमणी परिसरात सागवान झाडे मोठ्या प्रमाणात आहे. या सागवान तस्करीला अंकुश लावण्यासाठीच वन विभागाने काही वर्षांपूर्वी निमणी येथे वन नाका बांधला. हा नाका योग्य ठिकाणी आहे. तथापि गेल्या कित्येक वर्षांपासून हा नाकाच बेवारस आहे. त्याला कुणीच वाली नाही. या निमणी कक्षाला लागूनच घोन्सा वन वर्तुळाची सुरूवात होते़ वाढोणा (बंदी) व दाभाडी कक्ष हे निमणी कक्षाला लागूनच आहे़ या संपूर्ण वन परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात सागवान व इतर मौल्यवान वनसंपदा आहे़ ही वनसंपदा जतन करणे आवश्यक झाले आहे. मात्र वन विभगाचा नाकाच बेवारस असल्याने त्याचे जतन करसे करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. नाक्यावर कुणीच रहात नसल्याने या जंगलातील जंगलातील मौल्यवान वनसंपदा नष्ट होत असून तस्करांचे फावत आहे. झरी तालुक्यात बंदी वाढोणा, दरारा, झमकोला, शिबला या जंगलातही मोठ्या प्रमाणात सागवान वृक्ष आहे. उन्हाळ्यात याच सागवानापासून लग्नात भेट देण्यासाठी विविध साहित्य तयार केले जाते. त्यासाठी वृक्षतोड होते. त्यामुळे जंगल आता विरळ होत आहे. मात्र वाघाच्या दहशतीने काही प्रमाणात ही जंगल तोड थांबली आहे. तथापि वन विभागाने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे.
मौल्यवान वनसंपदा चोरट्यांच्या निशाण्यावर
By admin | Updated: June 22, 2015 02:14 IST