यवतमाळ : इतर राष्ट्रीय बँकांप्रमाणेच डाक विभागाचेही कोअर बँकींग करण्यात आले. परंतु पोस्टाचा संपूर्ण देशभर पसरलेला अवाका सबंधित कंपनीच्या लक्षात न आल्याने यामध्ये अनेक त्रुटी राहिल्या. परिणामी गेल्या सहा ते सात महिन्यांपासून डाक विभागाची सेवा कोलमडली आहे. याचा सर्वाधिक फटका ग्राहकांसोबतच डाक कर्मचाऱ्यांनाही सहन करावा लागत आहे. पोस्ट आॅफीसचे कोअर बँकींग होऊन सर्व सेवा आॅनलाईन होईल व सर्वांना जलद सेवा मिळेल, ग्राहकांना वेळेवर सेवा मिळेल कर्मचारीही समाधानी राहतील, या आशेवर पोस्टाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी दिवसरात्र परिश्रम घेतले. त्यानंतर एकदाची ‘फिनॅकल’ व ‘मॅकॅमिश’ अशी गोंडस नावे धारण केलेले सॉप्टवेअर पोस्टात कार्यान्वित करण्यात आले. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी फोटोसेशन करून एकमेकांना अभिनंदन देऊन पाठ थोपटून घेतली परंतु आज हेच सॉप्टवेअर कर्मचाऱ्यांच्या मानगुटीवर बसल्याचा आरोप आॅल इंडिया पोस्टल एम्लॉईज युनियन, शाखा यवतमाळने केला आहे. कोणताही नवीन प्रकल्प राबविताना त्यासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध असणे गरजेचे आहे. उपकरणे, पायाभूत तंत्रज्ञान व प्रशिक्षित कर्मचारी वर्गाची उपलब्धता असणे गरजेचे होते. परंतु डाक विभागाच्या वरिष्ठांनी याकडे लक्ष दिलेले नाही. परिणामी आज डाक विभागाची सेवा कोलमडली असून ग्राहकांचा संताप ग्राहकांना दैनंदिन सेवा देणाऱ्या सामान्य कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत आहे. पायाभूत सुविधा, उपकरणे, लेझर प्रिंटर्स, आवश्यक बँड विथ स्पिड, पुरेसे प्रशिक्षित कर्मचारी यापैकी काहीही नसताना डाक विभागाला आॅनलाईन करण्यात आले. त्यामुळे ग्राहकांना पटवून पीएलआयचे टारगेट आम्ही पूर्ण करायचे व नंतर सेवा ठप्प झाल्यावर शिव्याही आम्हीच खायच्या का, असा प्रश्न डाक कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांना विचारला आहे. या सर्व प्रकाराबाबत आॅल इंडिया पोस्टल एम्पॉइज युनियनने २१ एप्रिल २०१६ रोजी संपाचा इशारा दिला होता. परंतु त्यापूर्वीच १८ एप्रिलला युनियनसोबत वरिष्ठांनी सकारात्मक चर्चा करून कर्मचाऱ्यांचे सर्व प्रश्न सोडवून ग्राहकांनाही वेळेत सेवा मिळेल, यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे २१ चा संप तूर्तास स्थगित करण्यात आला. (प्रतिनिधी)क्षमतेपेक्षा अधिक लोडमुळे कामात व्यत्यय४डाक विभाग संपूर्ण आॅनलाईन, कोअर बँकींग करण्यासाठी देशातील एका नामांकीत कंपनीने सॉप्टवेअर डेव्हलप केले आहे. परंतु पोस्टाचा देशभरातील कामाचा व्याप बघता नेमका अंदाज घेता न आल्याने हे सॉप्टवेअर लोड सहन करीत नाही. याचे मुख्य सर्व्हर दिल्लीला आहे. यासाठी नेटवर्क पुरविण्याचे काम सिफी नामक कंपनीकडे देण्यात आले आहे. यासाठी लागणारा आवश्यक स्पिड मात्र मिळत नाही. त्यामुळे सर्व्हर वारंवार बंद पडते. नंबर आॅफ ट्रांजेक्शन जास्त असल्यास हे सर्व दैनंदिन व्यवहार ठप्प पडतात. या सर्व भानगडित काऊंटरसमोर ग्राहकांची लांबच लांब रांग लागते. सर्व्हर केंव्हा सुरू होईल, हे नेमके सांगता येत नाही. ग्राहकांचा रोष कर्मचाऱ्यांना सहन करावा लागतो. नवीन खाते उघडण्यासाठी कर्मचाऱ्यांना रात्री दहा ते अकरा वाजेपर्यंत वाट पाहावी लागते. महिला कर्मचाऱ्यांनाही बऱ्याचदा रात्री थांबावे लागते.
कोअर बँकींगच्या नादात डाकसेवा कोलमडली
By admin | Updated: April 22, 2016 04:22 IST