लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शिक्षणात यशाचे शिखर गाठल्यावर मातीकडे खाली झुकून पाहण्याची तसदी आजचे तरुण घेत नाही. उलट बक्कळ पैसा कमाविण्यासाठी उच्च पदस्थ नोकºया मिळविण्यासाठी किंवा उद्योजक होण्याचा मार्ग धुंडाळतात. अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या कृषीक्षेत्रात तल्लख बुद्धिमत्तेचे तरुण येत नसल्याने हे क्षेत्र आज विविध संकटांचा सामना करीत आहे. अशा वेळी यवतमाळातील एका तरुणाने मात्र शेतीची वेगळी वाट निवडली आहे. विषमुक्त भाजीपाला व फळे उगविण्याचा त्यांचा मनसुबा अनेकांसाठी जीवदान ठरणार आहे.लव किशोर दर्डा असे या तरुणाचे नाव आहे. त्यांनी बारावीनंतर व्हीआयटी वेल्लूर या नामांकित अभियांत्रिकी विद्यापीठातून शिक्षण घेतले. जैवतंत्रज्ञान (बायोटेक्नॉलॉजी) या विषयात बीटेकची पदवी घेऊन इंग्लंडमधील जागतिक कीर्तीच्या शेफिल्ड विद्यापीठातून मॉलीक्युअर मेडिसिन या विषयात मास्टर्सची पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी ओरल (नाक, कान, घसा, तोंड, मेंदू) कॅन्सर या विषयात पीएचडी घेतली आहे.घरात शिक्षणाचे वारे, उच्च पदस्थ नोकरी पटकावणे तसे कठीण नव्हते. उद्योजक होण्याचा मार्गही फारसा कठीण नव्हता. पण त्यांनी शेतीची वाट चोखाळण्याचा निर्णय घेतला. एकीकडे शेतीविषयी सर्वसामान्यांच्या मनात औदासिन्य असताना, या उच्चविद्याविभूषीत तरुणाने शेतीकडे मोर्चा वळविल्याने बºयाच जणांना आश्चर्य वाटले.कौन कहता हैं आसमान मे सुराग नही होताएक पत्थर तो तबियत से उछालो यारो...ही ध्येयासक्ती उराशी बाळगणारा माणूस कधीही मागे राहात नाही. मी शिकलो, मोठा झालो याचा गर्व न बाळगता मेहनतीची तयारी ठेवून त्यांनी वाटचाल सुरू केली आहे. पण शेती करतानाही ‘युनिकनेस’ शोधला. शेतीतून पिकणारा भाजीपाला, फळे नागरिकांना सुदृढ आरोग्य देणारे ठरावे, हा त्यांचा उद्देश आहे. त्यांनी विषमुक्त भाजीपाला, फळे उगविण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी सेंद्रीय शेतीवर त्यांनी भर दिला आहे. यवतमाळ शहरालगत भारी शेतशिवारात त्यांची शेती सध्या सकस भाजीपाला व फळांनी बहरली आहे. तेथून संपूर्णपणे विषमुक्त पद्धतीने पिकविलेला भाजीपाला थेट यवतमाळात पोहोचतोय. या उच्चशिक्षित तरुणाच्या प्रयत्नामुळे यवतमाळकरांना शुद्ध, सकस, ताजा आहार मिळतोय. ज्या शेतीकडे कोणीही नकारात्मक नजरेने बघतो, तीच शेती आजच्या अनेक प्रश्नांची उकल करू शकते. हाच विश्वास बाळगून लव दर्डा यांनी शेतीला नवा आयाम अन् नागरिकांना औषधांपेक्षाही उत्तम आहार देण्याचा विडा उचलला आहे.
मी डॉक्टर... म्हणून विषमुक्त अन्नाचा पुरस्कर्ता ! याबाबत बोलताना लव दर्डा म्हणाले, मी शेतकरी असण्यासोबतच ओरल कॅन्सरचा पीएचडी डॉक्टर आहे. आज जगात कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. त्यात कॅन्सरच्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. कारण आपण घेत असलेला आहार हा विषाक्त आहे. भाजीपाला असो किंवा फळपिक असो, प्रत्येक झाडावर विषारी रसायनांचा प्रचंड मारा केला जातो. घरी आणलेला भाजीपाला किंवा फळे धुवून टाकल्यावरही त्यातील विषारी घटक नष्ट होत नाही. अशा अन्नातून कॅन्सरसह इतरही आजारांचे आपण बळी ठरत असतो. औषधोपचारावर बेसुमार खर्च करूनही अनेकदा जीव जातो. ‘प्रिव्हेंशन इज बेटर द्यान क्यूअर’ असे आमच्या कॅन्सरच्या संशोधनाच्या क्षेत्रात म्हटले जाते. उपचारापेक्षा रोगच होऊ नये यासाठी प्रयत्न केला पाहिजे. त्याच उद्देशाने मी विषमुक्त शेती करीत असून त्यातून संपूर्ण शुद्ध अन्न नागरिकांना मिळावे, हा प्रयत्न आहे.