हजारो शेतकऱ्यांची अशीही थट्टा : विमा हप्ता भरला हेक्टरी ३४३ रुपयेयवतमाळ : आधीच अस्मानी व सुलतानी संकटांनी ग्रासलेल्या शेतकऱ्यांची आता विमा कंपन्यांनीही थट्टा चालविली आहे. हेक्टरी ३४३ रुपये विमा हप्ता भरणाऱ्या शेतकऱ्यांना केवळ ८७ रुपये प्रति हेक्टरी नुकसानभरपाई मंजूर करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार आर्णी तालुक्यात उघडकीस आला. गेल्या खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. आणेवारी ५० पैशापेक्षा कमी आल्याने जिल्ह्यात शेतकऱ्यांना विमा कंपन्यांकडून नुकसानभरपाई मिळणे सुरू झाले आहे. जिल्ह्यात ११८ कोटी रुपयांचा पीक विमा दिला जाणार आहे. परंतु हा विमा नुकसानभरपाई देताना शेतकऱ्यांची अनेक ठिकाणी जणू थट्टा केली जात आहे. आर्णी तालुक्यात एक हजार पेक्षा अधिक शेतकऱ्यांची अशी थट्टा केल्याचा प्रकार पुढे आला. आर्णी सर्कलमधील अल्पभूधारक शेतकऱ्यांनी प्रती हेक्टरी १७२ रुपये तर सर्वसाधारण शेतकऱ्यांनी ३४३ रुपये हेक्टरी विमा हप्ता भरला. परंतु प्रत्यक्षात त्यांना नुकसानभरपाई केवळ ८७ रुपये प्रती हेक्टरी दिली गेली. नुकसानभरपाईची ही रक्कम पाहून शेतकरी संतापले आहे. शासन आम्हाला दिलासा देण्याऐवजी आमच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न करीत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून ऐकायला मिळाल्या. जिल्ह्यात अनेक प्रकरणेआर्णी तालुक्यात हेक्टरी ८७ रुपये पीक विमा नुकसानभरपाई देण्याचे प्रकार पुढे आले असले तरी जिल्ह्यातील अन्य १५ तालुक्यातसुद्धा असे प्रकार असण्याची शक्यता नाकारता येत नाही. (जिल्हा प्रतिनिधी)
आर्णीत केवळ ८७ रुपये पीक विमा
By admin | Updated: June 16, 2016 02:48 IST