कृषी विभागाची माहिती : अनेक ठिकाणी दुबार पेरणीचे संकटनरेश मानकर पांढरकवडाकृषी उपविभागातील पांढरकवडा, मारेगाव, वणी व झरी तालुक्यात आत्तापर्यंत केवळ ६८ टक्केपेरणी पूर्ण झाली आहे. त्यातही काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.पांढरकवडा कृषी उपविभागातील चारही तालुक्यात दोन लाख १५ हजार १६० हेक्टर जमीन लागवडी योग्य आहे. यापैकी आत्तापर्यंत केवळ एक लाख ४५ हजार ८७१ हेक्टर जमिनीवरच पेरणी करण्यात आली आहे. मृग नक्षत्रात चांगला पाऊस येईल, असा हवामान खात्याचा अंदाज होता. सुरूवातीला पाऊस झाल्यानंतर काही भागात पेरणीला सुरूवातदेखील करण्यात आली. काही भागात धूळ पेरणीही करण्यात आली. परंतु मृग नक्षत्रात पाहिजे तसा पाऊस न आल्यामुळे धूळ पेरणी वाया गेली. सुरूवातीला पाऊस आल्यानंतर शेतात पेरणी केलेल्या शेतकऱ्यांचे बियाणेही वाया गेले. शेतकऱ्यांनी महागडी बी-बीयाणे खरेदी करून लगबगीने पेरणी आटोपली. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पाऊस येईलच, अशी अपेक्षा होती. परंतु हवामान खात्याचा अंदाज फोल ठरवित पावसाने दगा दिल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार आहे. आधीच कर्जबाजारी असलेल्या शेतकऱ्यांनी महागडे बी-बियाणे खरेदी करून आपल्या शेतात पेरणी केली. परंतु पावसाअभावी बियाण्यातून निघालेले अंकूर जमिनीच्या गर्भातच करपले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे.उपविभागात दोन लाख १५ हजार १६० हेक्टर क्षेत्रापैकी केवळ एक लाख ४५ हजार ८१७ हेक्टर जमिनीवर पेरणी आटोपली आहे. यांपैकी एक लाख सहा हजार ७५ हेक्टर क्षेत्रात कापूस या नगदी पिकाची लागवड करण्यात आली. २१ हजार ४०५ हेक्टरवर तूर, १५ हजार ९१५ हेक्टरवर सोयाबीनची, तर एक हजार ५० हेक्टर जमिनीवर ज्वारीची लागवड करण्यात आली. पांढरकवडा तालुक्यात आतापर्यंत ८५ टक्के पेरणी आटोपली आहे. ५८ हजार २० हेक्टरपैकी ४९ हजार ६२५ हेक्टर क्षेत्रात पेरणी आटोपली असून सर्वाधिक ३१ हजार १६० हेक्टर जमिनीवर कपाशीची लागवड करण्यात आली आहे. नऊ हजार १४० हेक्टर जमिनीवर सोयाबीनची पेरणी करण्यात आली असून सात हजार ६३० हेक्टरवर तूरीची पेरणी करण्यात आली आहे. वणी तालुक्यात केवळ ५७ टक्केपेरणी आटोपली असून ६४ हजार ३० हेक्टरपैकी ३६ हजार ३४५ हेक्टरमध्ये पेरणी करण्यात आली. ३२ हजार ७२५ हेक्टरवर कापूस, तीन हजार ३२५ हेक्टरवर तूर, तर केवळ १२५ हेक्टरवर सोयाबीनची लागवड करण्यात आली. मारेगाव तालुक्यात ५६ टक्के पेरणी पुर्ण झाली असून ४४ हजार ३८० हेक्टरपैकी २४ हजार ९३८ हेक्टर जमिनीवर पेरणी करण्यात आली आहे. यामध्ये १८ हजार २४० हेक्टरवर कापूस, चार हजार ५०० हेक्टरवर तूर, तर दोन हजार १०० हेक्टरवर सोयाबीनची लागवड करण्यात आली आहे. झरी तालुक्यात ७२ टक्के पेरणी आटोपली असून ४८ हजार ७३० हेक्टरपैकी ३४ हजार ९०९ हेक्टरवर ही पेरणी आटोपली आहे.गेल्या तीन-चार वर्षांपासून सतत पडत असलेल्या दुष्काळामुळे कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांना सुरवातीपासूनच निसर्गाने साथ न दिल्यामुळे शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शेकडो शेतकऱ्यांना अद्याप बँकेकडून पिक कर्जही मिळाले नाही.
वणी उपविभागात केवळ ६८ टक्के पेरणी
By admin | Updated: June 30, 2016 02:42 IST