वणी : शासनाने मोठा गाजावाजा करून सर्व सेतूचा कारभार आॅनलाईन केला. मात्र येथील सेतूमध्ये सध्या आॅफलाईन कारभार सुरू आहे. दररोज हजारो रूपयांचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमाच होत नाही. सेतूमध्ये प्रमाणपत्रांसाठी दररोज लांबच लांब रांग लागत असल्याने विद्यार्थी त्रस्त झाले आहे. त्याचबरोबर अनेक केसेस गहाळसुद्धा होत असल्याचे दिसून येत आहे.सध्या दहावी व बारावीचा निकाल लागल्याने पुढील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी विविध प्रमाणपत्रे काढण्यासाठी धावपळ सुरू केली आहे. तहसीलच्या सेतूमध्ये जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र व उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी दररोज प्रचंड गर्दी होत आहे. सेतूमधील गर्दी बघून अनेक नागरिक तोंडावर बोट ठेवत आहे. मात्र येथील सेतूमधील आॅनलाईनचा कारभार सध्या आॅफलाईनवर आला आहे. या आॅफलाईनमुळे सेतूमधील कर्मचाऱ्यांना चांगलाच लाभ होत आहे. सेतूमधून कोणतेही प्रमाणपत्र आॅनलाईन काढले, तर त्याचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा होतो. मात्र आॅफलाईन कागदपत्रे काढली, तर त्याला कोणतेही शुल्क लागत नाही. तथापि विद्यार्थी, पालकांकडून सेतूतील कर्मचारी संपूर्ण रक्कम वसूल करीत आहे. पालक, विद्यार्थ्यांना हे कर्मचारी शिक्का मारलेली पावती देत आहे. त्यामुळे येथील कर्मचारी शासकीय तिजोरीला चुना लावत असल्याचे दिसून येत आहे.विशेष म्हणजे जेथे टिनाचे शेड आहे, तेथे विद्यार्थ्यांना उभे न करता दुसऱ्या बाजूकडील खिडकीजवळ विद्यार्थ्यांना रांग लावण्यास कर्मचारी सांगत आहे. आता पावसाळ्याचे दिवस सुरू आहे. अधूनमधून पाऊस हजेरीही लावत आहे. विद्यार्थ्यांच्या हातात महत्वाची कागदपत्रे असल्याने पावसाचे शिंतोडे लागताच ते रांग सोडून छताच्या शोधात भटकत आहे. त्यांची धावाधाव होताना दिसत आहे. मात्र टिनाच्या शेडमधून त्यांचे कागदपत्रे घेण्यात येत नाही. त्यामुळे विद्यार्थी सेतूमधील कर्मचाऱ्यांवर रोष व्यक्त करीत आहे. आता प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना तातडीने कागदपत्रे मिळणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र पावतीवर दिलेला दिवस निघून गेल्यानंतरही विद्यार्थ्यांच्या हातात प्रमाणपत्र पडत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे सेतूमधून अनेक केसेस गहाळ होत असल्याचेही दिसून येत आहे. काही केसेस शोधल्यानंतर सापडतात, तर काही केसेस मात्र पुन्हा विद्यार्थ्यांना अर्जनविसांमार्फत बनवून घ्यावी लागत आहे. परिणामी त्यांचीही चांगलीच तारांबळ उडत आहे. येथील सेतू केंद्रावर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा वचक नसल्याने सेतूतील कर्मचाऱ्यांचे चांगलेच फावत आहे. सेतूमधील काही कर्मचारी अल्पशिक्षित असल्याने प्रमाणपत्रे काढण्यासाठी त्यांना जास्त वेळ लागतो. पूर्वीच्या काही कर्मचाऱ्यांनी सेतूच्या कारभाराला कंटाळून काम सोडून दिले आहे. त्यामुळे आता सेतूमध्ये अनेक नवीन व अल्पशिक्षीत कर्मचारी दिसून येत आहे. या कर्मचाऱ्यांचा विद्यार्थी व पालकांना त्रास सहन करावा लागत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
वणी सेतूत आॅनलाईनऐवजी आॅफलाईन
By admin | Updated: June 26, 2015 02:27 IST