बळीराजा चेतना अभियान : पशु व मत्स्य पालनास प्रोत्साहन देण्याची पालकमंत्र्यांची सूचनायवतमाळ : चेतना अभियानांतर्गत अधिकाऱ्यांनी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणे आवश्यक आहे, असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले.बचत भवन येथे बळीराजा चेतना अभियानाच्या अंमलबजावणीचा आढावा पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ.आरती फुफाटे, खासदार भावना गवळी, आमदार माणिकराव ठाकरे, आमदार मदन येरावार, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग, अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अशोक राठोड उपस्थित होते.कृषी, पशु, मत्स्य आणि दुग्धव्यवसाय विभागांनी शेतकऱ्यांना जोडधंदा उपलब्ध करून देण्यासाठी काम करणे आवश्यक असल्याचे पालकमंत्री म्हणाले. अभियानांतर्गत ग्रामस्तरीय समित्या लवकरात लवकर स्थापन करून समित्यांचे काम सुरु झाले पाहिजे. कमी खर्चात आणि कोरडवाहू शेती चांगल्या पध्दतीने करता यावी म्हणून कृषी विभागाने या पध्दतीबाबत प्रचार व प्रसार करण्याची सूचना पालकमंत्र्यांनी केली. संजय गांधी व श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी शोधून त्यांना लाभ दिला जावा. अन्नसुरक्षा योजनेसह प्राधान्य कुटुंबातील योजनेसाठी पात्र शेतमजूर, भूमिहीनांचा यादीत समावेश करण्यात यावा. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. आरती फुफाटे, खासदार भावना गवळी, आमदार माणिकराव ठाकरे, आमदार मदन येरावार यांनीही वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना बैठकीत केल्या. जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह तथा निवासी उपजिल्हाधिकारी यांनी अभियानांतर्गत राबविण्यात येत असलेल्या कार्यक्रमांची तसेच अभियानाच्या प्रगतीची माहिती सादर केली. शेवटी खवले यांनी मान्यवरांचे आभार मानले. (स्थानिक प्रतिनिधी)
अधिकाऱ्यांनो, नावीन्यपूर्ण उपक्रम राबवा
By admin | Updated: October 5, 2015 02:33 IST