लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा परिषदेत नवीन पदाधिकारी व नवीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमुळे ‘नवे गडी, नवे राज’ आले आहे. पदाधिकाऱ्यांना जेमतेम तीन महिनेच झाले. त्यातच आता नवीन सीईओ आल्याने जिल्हावासीयांच्या नजरा जिल्हा परिषदेकडे लागल्या आहे.तीन महिन्यांपूर्वी जिल्हा परिषदेत नवीन अध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांची निवड झाली. महाविकास आघाडीच्या नावाखाली शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसने सत्ता स्थापन केली. सहा पदाधिकाऱ्यांपैकी तीन पदे शिवसेनेच्या, दोन पदे काँग्रेसच्या तर एक पद राष्ट्रवादीच्या वाटणीला आले. मात्र नवीन पदाधिकाऱ्यांनी कामकाजाची सुरुवात करताच जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला. त्यामुळे लॉकडाऊन असल्याने जवळपास सर्वच कामकाज ठप्प पडल्यासारखे झाले. कर्मचाऱ्यांची उपस्थितीसुद्धा रोडावली. शासनानेच जवळपास तीन महिने कर्मचाºयांच्या उपस्थितीतवर निर्बंध घातले. त्यानुसार सुरुवातीला केवळ पाच टक्के कर्मचारी कार्यरत होते. या काळात अनेक पदाधिकाऱ्यांनी वास्तूत येण्याचेही टाळले.तीन महिन्यांचा अवधी लॉकडाऊनमध्ये गेल्याने नवीन पदाधिकाऱ्यांना अद्यापही मनमोकळेपणाने काम करता आले नाही. पदभार घेताच त्यांच्या मागे कोरोनाचे शुक्लकाष्ठ लागले. आता या नवीन पदाधिकाऱ्यांच्या साथीला नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी लाभले आहे. डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी सीईओपदाची सूत्रे हाती घेतली आहे. मावळते मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा यांच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात काही विभागांना शिस्त लागली. मात्र वास्तूत त्यांचा वचक दिसून आला नाही. आता नवीन सीईओ प्रशासकीय शिस्त लावून कर्मचाऱ्यांवर वचक ठेवतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.नवीन पदाधिकारी व नवीन सीईओ जिल्ह्याला प्रगतिपथावर नेण्याची अपेक्षा आहे. जिल्हा परिषदेच्या विविध योजना तळागळापर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. जिल्ह्यातील नागरिकांना योजनाचा लाभ मिळावा याकडे लक्ष द्यावे लागणार आहे.डॉक्टरांना नस सापडेल काय ?नवीन सीईओ स्वत: डॉक्टर आहे. यवतमाळ जिल्ह्याचा व्याप मोठा आहे. याची त्यांना जाणीवही आहे. पदभार ग्रहण करताच त्यांनी आरोग्यविषयक बाबींकडे लक्ष देणार असल्याचे निक्षून सांगितले. जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र मोठे असल्याने आधी त्यांना सांगोपांग विचार करावा लागणार आहे. मात्र नवीन सीईओ यांना ग्रामीण भागाविषयी ओढ असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे खऱ्याअर्थाने शासनाच्या विविध योजना तळागळापर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांना प्रशासनाची नस सापडेल काय, असा प्रश्न आहे.
‘झेडपी’त नवे गडी, नवे राज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 05:00 IST
तीन महिन्यांपूर्वी जिल्हा परिषदेत नवीन अध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांची निवड झाली. महाविकास आघाडीच्या नावाखाली शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसने सत्ता स्थापन केली. सहा पदाधिकाऱ्यांपैकी तीन पदे शिवसेनेच्या, दोन पदे काँग्रेसच्या तर एक पद राष्ट्रवादीच्या वाटणीला आले.
‘झेडपी’त नवे गडी, नवे राज
ठळक मुद्देकामकाजाकडे लक्ष : योजना तळागळापर्यंत पोहोचण्याची अपेक्षा