लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : खुल्या बाजारात हरभऱ्याचे दर घसरले आहे. यामुळे हरभऱ्याची विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपला मोर्चा नाफेडकडे वळविला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात अडीच लाख क्विंटल हरभऱ्याची खरेदी झाली आहे. आतापर्यंतची ही विक्रमी खरेदी असल्याची नोंद घेण्यात आली आहे. खुल्या बाजारात हरभऱ्याला साडेचार हजार रुपये क्विंटलचा दर मिळत आहे, तर हमी केंद्रावर हरभऱ्याला पाच हजार २३० रुपये क्विंटलचा दर आहे. यामध्ये ७३० रुपयांची तफावत आहे. याच कारणाने शेतकऱ्यांनी हरभऱ्याच्या खरेदीसाठी नाफेडकडे धाव घेतली आहे. जिल्ह्यात मार्केटिंग फेडरेशन आणि विदर्भ मार्केटिंग फेडरेशनचे केंद्र सुरू करण्यात आलेली आहे. याशिवाय काही शेतकरी उत्पादक कंपन्यांनीही हरभऱ्याची खरेदी गावपातळीवर सुरू केली आहे. सद्यस्थितीत मार्केटिंग फेडरेशन आणि व्हीसीएमएसचा खरेदीचा आकडा पुढे आला आहे. दोघांनी आतापर्यंत दोन लाख ४२ हजार ६८८ क्विंटल हरभऱ्याची खरेदी केली आहे. विक्रमी खरेदीमुळे शेतमाल ठेवायचा कुठे, असा प्रश्न खरेदीदारांपुढे निर्माण झाला आहे. शेतमालाची खरेदी झाल्यानंतर त्याच कार्यक्षेत्रातील ५० किलोमीटर अंतरामध्ये शेतमाल ठेवण्यास मंजुरी देण्यात आली आहे. ५० किलोमीटरमध्ये उपलब्ध गुदामात शेतमाल ठेवण्यासाठी जागा नाही. यामुळे खरेदी होणारा शेतमाल पुढे दुसऱ्या ठिकाणी जाईपर्यंत प्रतीक्षा करावी लागत आहे. यातूनच हरभरा खरेदीसाठी शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सूचनांची संख्या कमी करण्यात आली आहे. यातून खरेदीची गती मंदावली आहे.
खरेदी ५४ कोटींची, मिळाले २६ कोटी- हरभऱ्याची खरेदी झाल्यानंतर शेतमाल विकलेल्या शेतकऱ्यांना ठरावीक कालावधीमध्ये हमी दरानुसार पैसे मिळणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत खरेदी झालेल्या शेतमालापैकी निम्म्याच शेतमालाचे पैसे वळते झाले आहे. ५४ कोटी रुपयांचा हरभरा खरेदी झाला असला तरी २६ कोटी रुपयांचे चुकारे करता आले आहे. शेतकऱ्यांना चुकाऱ्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.