दिग्रस : आईने दुसरे लग्न केले. तो आपल्या आईसोबत गेला. तेथे मुलाच्या नावासोबत दुसऱ्या पतीचे नाव लावले. तब्बल ३९ वर्ष तो याच नावाने ओळखला जात होता. मात्र एक दिवस वादातून खऱ्या वडिलांचे नाव माहीत झाले. वडिलांचे खरे नाव लावण्यासाठी त्याने न्यायालयात धाव घेतली. अखेर न्यायालयाने त्याच्या बाजूने निर्णय दिला. तब्बल ४० वर्षानंतर वडिलांचे नाव मिळाले. मुरलीधर थावरा पवारचा आता विकास नरसिंग चव्हाण झाला. मुरलीधर ऊर्फ विकास दिग्रस तालुक्यातील सेवानगर येथे राहतो. आॅटोरिक्षा चालविण्याचा त्याचा व्यवसाय आहे. १४ जानेवारी २०१४ रोजी क्षुल्लक कारणावरून घरगुती वाद झाला. या वादात थावरा वाघू पवार याने तू माझा मुलगा नाही, असे म्हटले. त्यामुळे मुरलीधरने आपले नेमके वडील कोण अशी विचारणा केली. त्याला सत्य परिस्थिती सांगण्यात आली. त्यावेळेस त्याचाही विश्वास बसत नव्हता. मुरलीधरची आई कौशल्याबाई हिचे दोन विवाह झाले होते. पहिल्या पतीचे नाव नरसिंग मोहनसिंग चव्हाण होते. मात्र त्यांच्यासोबत काडीमोड घेऊन कौशल्याबाईने थावरा पवारसोबत संसार थाटला. यावेळेस तिच्यासोबत एक वर्षाचा मुलगा होता. दुसरे लग्न करून त्याला सोबत नेले होते. दरम्यान शाळेत नाव टाकताना वडील म्हणून थावरा पवार अशी नोंद करण्यात आली. तोही मुरलीधर थावरा पवार या नावानेच आपली ओळख सांगत होता. त्याला आपले वडील कोण आहे हे माहीतच नव्हते. मात्र क्षुल्लक कारणावरून वाद झाला आणि खऱ्या वडिलांचे नाव पुढे आले. मुरलीधरने आपल्या नावाचा रोहडा येथील ग्रामपंचायतीतून जन्म नावानुसार दाखला मिळविला. त्यानुसार विकास नरसिंग चव्हाण असल्याचे स्पष्ट झाले. या नोंदीवरून नरसिंग चव्हाण, कौशल्या पवार आणि थावरा पवार यांना मूळ नाव शासकीय दप्तरी नोंदविण्यासाठी मदतीची विनंती केली. मात्र या तिघांनीही नकार दिला. त्यामुळे मुरलीधरने दिग्रस येथील दिवाणी न्यायालयात दाद मागितली. या ठिकाणी सुनावणी होऊन मुरलीधर थावरा पवार याचे खरे नाव विकास नरसिंग चव्हाण असल्याचे स्पष्ट झाले. तब्बल ४० वर्षानंतर खऱ्या वडिलांचे नाव मिळाले. या प्रकरणामुळे तालुक्यात खळबळ उडाली असून विकास उर्फ मुरलीधरच्यावतीने अॅड. गिरीष दळवी यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)
मुरलीधरला तब्बल ४० वर्षांनंतर मिळाले वडिलांचे नाव
By admin | Updated: February 11, 2015 00:06 IST