पुन्हा आश्वासन : घाटंजी पंचायत समिती प्रशासनाने काढली समजूत
घाटंजी : तालुक्यातील शेतकर्यांच्या प्रश्नांना घेवून मंगळवारी पंचायत समितीसमोर धरणे देण्यात आले. दरम्यान, पंचायत समिती प्रशासनाने प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. गटविकास अधिकारी चंद्रकांत बंड, कृषी अधिकारी संजय पवार, जिल्हा परिषदेचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित झालेले संजय वानखडे, विस्तार अधिकारी उडाखे यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. मग्रारोहयो कक्षांतर्गत येणार्या कामात सुसुत्रता राहावी आणि कामे जलद गतीने व्हावी यासाठी कामे विभागून दिली. ई-मस्टर संदर्भात तातडीने कामे व्हावी यासाठी सध्या तहसील कार्यालयातील डाटा एन्ट्री आॅपरेटरकडून प्रक्रिया पूर्ण करून घेतली जाईल. नव्याने दोन डाटा एन्ट्री आॅपरेटरसाठी पाठपुरावा केला जात आहे. २०१२-१३ च्या मॅन्युअल मस्टरमध्ये अकुशल देयकाच्या अदायगीसंबंधात पंचायत समितीस्तरावर कारवाई करून पुढील कारवाईसाठी जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव सादर केला आहे, अशी माहिती आंदोलनकर्त्यांना देण्यात आली. या आंदोलनात मधुकर निस्ताने, मोरेश्वर वातीले, पांडुरंग निकोडे आदी सहभागी झाले होते. दरम्यान, ठाणेदार कुरळकर यांनी व्यक्त केलेल्या रोषावरून काही काळ वातावरण गंभीर झाले होते. ‘आंदोलन मागे घेतले म्हणून बरे झाले, नाही तर मी तुम्हा सर्वांना गजाआड डांबले असते, मंडप जमा केला असता’ असे वक्तव्य ठाणेदार कुरळकर यांनी शांततेने आंदोलन करणार्यांविषयी केले. हीच बाब वातावरण गंभीर होण्यास कारणीभूत ठरली. कार्यालयाची तोडफोड करणार्यांना चहा पाजून सन्मानाची वागणूक देणार्या ठाणेदाराने शांततेत आंदोलन करणार्यांना दिलेला ‘दम’ याविषयी येथे चांगलीच चर्चा सुरू आहे. (तालुका प्रतिनिधी)