‘एनसीआरबी’ : ग्रामीण भागात प्रमाण वाढलेयवतमाळ : महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या २०१४ मध्ये झाल्या आहेत. विविध कारणांमुळे शेतकरी आत्महत्यांमध्ये २० टक्के वाढ झाली आहे. भारत सरकार गृहमंत्रालयाच्या राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरोने (एनसीआरबी) २०१४ च्या अहवालात ही बाब नमूद केली आहे. राजस्थान, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि बिहार या पाच राज्यात २०१४ मध्ये शेतकरी आत्महत्या झालीच नसल्याचा दावा या ब्युरोने केला आहे. कृषी नैराश्य, मानसिक तणाव यामुळे १२ हजार ३६० शेतकरी आणि शेतीवर निर्वाह करणारे भूमीहीन आणि शेतमजुरांच्या आत्महत्येचा आकडा २०१३ च्या तुलनेत पाच टक्केने वाढला आहे. २०१३ मध्ये हा आकडा ११ हजार ७७२ एवढा होता. २०१४ मध्ये महाराष्ट्रात चार हजार चार, तेलंगाणा एक हजार ३४७, मध्यप्रदेश एक हजार १९८ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. महाराष्ट्रात २०१४ मध्ये चार हजार चार, २०१३ मध्ये तीन हजार १४६ आणि २०१२ मध्ये तीन हजार ७४८ जणांनी कृषी नैराश्य व मानसिक तणावामुळे आत्महत्या केल्याचा अहवाल ‘एनसीआरबी’ने प्रकाशित केला आहे. कर्जबाजारीपणा आणि नापिकी ही प्रमुख कारणे सांगण्यात आली आहे. २०१५ च्या पहिल्या सहामाहीच्या सरकारी आकडेवारीवरून कृषी संकट अधिकच वाढले असून ग्रामीण भागात आत्महत्यांचा आकडा २०१४ च्या तुलनेत ५० टक्के जास्त आहे. याला २०१४ चा दुष्काळ आणि सततची नापिकीसह कापूस व सोयाबीनला मिळणारा अत्यंत कमी भाव असल्याचे अहवालात म्हटले आहे. यावर सरकारने तत्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी विदर्भ जनआंदोलन समितीचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केली आहे. आत्महत्या करणारे बहुतांश शेतकरी अल्पभूधारक, कोरडवाहू आहे. कर्जमुक्ती आणि अन्न व डाळीचे पीक घेण्यासाठी तसेच जोडधंद्यासाठी विशेष अनुदान देण्याची मागणी करण्यात आली. ‘एनसीआरबी’ने राजस्थान, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि बिहार या पाच राज्यात २०१४ मध्ये शेतकरी आत्महत्या झाली नसल्याचा दावा हास्यास्पद असल्याचे तिवारी यांनी म्हटले आहे. (वार्ताहर)
सर्वाधिक शेतकरी आत्महत्या गतवर्षी
By admin | Updated: July 19, 2015 02:37 IST