मुकुटबन : महात्मा फुले जलभूमी अभियानांतर्गत येथील २०० एकर क्षेत्रातील तलावातील गाळ लोकसहभागातून काढण्याला सुरूवात झाली आहे. याप्रसंगी स्वच्छता व ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर.एन.भुयार, गटविकास अधिकारी बी.एम.मेघावत, सरपंच शंकर लाकडे, ग्रामविकास अधिकारी विजय उईके, पंचायत समिती सदस्य सुरेश मानकर, ग्रामपंचायत सदस्य संदीप विंचू, प्रमोद मद्देलवार, रामलू मंदुलवार, मच्छिमारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष मनीराम पारशिवे यांच्यासह शेतकरी व सदस्य उपस्थित होते. या तलावातील गाळ काढून जेसीबी मशिनने नि:शुल्क ट्रॅक्टरमध्ये भरून देण्यात येत आहे. हा कार्यक्रम लोकसहभागातून करावयाचा असून शासनातर्फे जेसीबीला उत्खनन करण्यासाठी प्रती तास पाच लीटर डिझेल व एक लीटर आॅईल देण्यात येणार आहे. पाण्याची पातळी टिकून राहावी व भविष्यात पाणी टंचाई भासू नये, या उद्देशाने हा कार्यक्रम राबविण्यात येत असल्याचे, भुयार यांनी सांगितले. गटविकास अधिकारी मेघावत यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. नंतर ग्रामपंचायत कार्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला. संचालन विजय उईके यांनी केले. कार्यक्रमाला शेतकरी व ग्रामस्थांची उपस्थिती होती. झरी तालुक्यात २२ तलावातील गाळ काढण्यात येणार असल्याचे गटविकास अधिकाऱ्यांनी सांगितले. (शहर प्रतिनिधी)
मुकुटबन येथे लोकसहभागातून तलावातील गाळाचा उपसा
By admin | Updated: May 8, 2016 02:02 IST