मारेगाव : तालुक्यातील साखरा (कुंभा) येथील सुमन चांदेकर यांच्या शेतात गावातीलच दोघांनी जनावरे सोडून पिकांचे नुकसान केले़ याबाबत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे.साखरा येथील सुमन चांदेकर यांच्या शेतात कपाशी, तूर, सोयाबीन आदी पीक पेरण्यात आले आहे. चांदेकर परिवार त्यांच्या आईची प्रकृती बरी नसल्याने एक महिन्यापासून नागपूरला होते. हीच संधी साधून तेथीलच मनोहर देवाळकर, विकास तलांडे यांनी शेतात जनावरे सोडून पिके चारली व मोठे नुकसान केले, असा आरोप चांदेकर कुटुंबीयाने तहसीलदारांकडे निवेदनातून केला आहे. जनावरांना शेतात चरण्यासाठी सोडल्याने त्यांच्या पिकांचे ४ लाख ५० हजार रूपयांचे नुकसान झाल्याची तक्रार त्यांनी केली आहे. पिकांचे नुकसान झाल्याने चांदेकर कुटुंबीयांवर आता उपासमारीची वेळ ओढवली आहे़ यापूर्वी चांदेकर यांच्या गैरहजेरीत रबी हंगामात शेतातील हरभरा व ज्वारी पिकात जनावरे घालून नुकसान करण्यात आले होते, अशी त्यांची तक्रार आहे. त्याबाबत मारेगाव पोलिसांत त्यांनी तक्रार दाखल केली होती़ आता पुन्हा यावर्षी पुन्हा उभ्या शेतात जनावरे घालून पिके चारल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे़ यात त्यांचे नुकसान झाल्याने त्यांच्यावर आभाळ कोसळले आहे. आधीच दुबार, तिबार पेरणीने शेतकरी घायाकुतीस आले होते. त्यात पावसाने दगा दिल्याने उभी पिके करपली होती. आता जनावरे शेतात घातल्याने पुन्हा त्यांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी चौकशी करून तलांडे व देवाळकर यांच्याविरुद्ध कारवाई करावी, तसेच पिकांची नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी सुमन चांदेकर, भास्कर चांदेकर, विठ्ठल चांदेकर, रमेश चांदेकर यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे़ (तालुका प्रतिनिधी)
शेतात जनावरे सोडल्याने उभ्या पिकांचे झाले नुकसान
By admin | Updated: October 8, 2014 23:34 IST