कळंब : जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना असुविधेचा सामना करावा लागतो. नजीकच्या काही वर्षातील पटसंख्या पाहता, या शाळांवरून पालकांचा विश्वास उडत असल्याचे दिसून येते. विद्यार्थ्यांची गळती हा विषय सर्वांसाठी चिंतेचा ठरत आहे.ग्रामीण भागातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांची रोडावणारी संख्या ही तफावत अधोरेखित करणारी आहे. बहुतांश शाळांमध्ये शौचालय, विद्युत पुरवठा, अपंगांसाठी रॅम्प, खेळांचे मैदान आदी बाबींचा अभाव आहे. शाळेला पुरविलेले संगणक शोभेची वस्तू ठरू लागले आहे. याला काही शाळा अपवाद असतीलही. पण शाळा तपासणीसाठी कोणी आला तरच संगणकावरील धूळ झटकली जाते, ही वास्तविकता आहे. काही शाळांना संगणकाची प्रतीक्षा आहे. कळंब तालुक्यात तर बहुतांश शाळांमध्ये किचनशेड नाही. मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह नाही. पिण्यासाठी स्वच्छ पाण्याची व्यवस्था नाही. पुस्तके वेळेवर दिली जात नाही. गणवेश वाटपातही विलंब केला जातो. यावरून जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये पायाभूत सुविधांची अवस्था बिकट असल्याचे दिसून येते. याउलट खासगी शाळांमध्ये भरमसाठ फी असतानाही विद्यार्थ्यांनी संख्या वाढत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे शिक्षक पालकांचा विश्वास गमावत असल्याचे दिसून येते. विद्यार्थी संख्या रोडावण्याऱ्या मुलभूत कारणांची कारणमिमांसा करण्यात शिक्षण विभाग कमी पडत आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शिक्षकवर्ग केवळ पगारासाठी येतात, विद्यार्थ्यांप्रती त्यांची खास बांधिलकी नसते, असा आरोपही पालकातून केला जातो. ही स्थिती कायम राहिल्यास येणाऱ्या काळात शिक्षकांवर अतिरिक्त ठरण्याची वेळ येणार आहे. (तालुका प्रतिनिधी)
शाळांमध्ये प्राथमिक सुविधांचा अभाव
By admin | Updated: July 28, 2014 23:46 IST