यवतमाळ : ओबीसी प्रवर्गाला आरक्षण देण्यासाठी कालेलकर आणि मंडल आयोगाने शिफारशी केल्या होत्या. मात्र केंद्र आणि राज्य सरकारने या शिफारशींची कुठलीही दखल घेतली नाही. त्यामुळे ओबीसीला आरक्षण असूनही ते नसल्यासारखेच आहे. त्यामुळे ओबीसींच्या विविध मागण्यांची तत्काळ अंमलबजावणी करा, यासाठी ओबीसी आरक्षण समर्थक कुणबी परिषदेच्यावतीने शनिवारी दुपारी मोर्चा काढला होता. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांना मोर्चातील शिष्टमंडळाने निवेदन दिले.ओबीसींची जातनिहाय गणना करण्यात यावी, ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना १०० टक्के शिष्यवृत्ती देण्यात यावी, जिल्हा आणि तालुका पातळीवर त्यांच्यासाठी वसतिगृहाची सुविधा करावी, ओबीसी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षण द्यावे, ओबीसी विद्यार्थ्यांकरिता आश्रमशाळा असाव्या, गरीब, श्रीमंत असा भेद दर्शविणारी क्रिमिलीअरची अट रद्द करावी, या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. ओबीसी आरक्षण समर्थक कुणबी परिषदेचे अध्यक्ष प्रदीप वादाफळे, पदाधिकारी राजू देशमुख, सतीश भोयर, विशाल चुटे, बाबाराव कांबळे, ज्ञानेश्वर आसुटकर, सुदाम बोंद्रे, भानुदास कानारकर, शिवदास टाले आदींनी मोर्चाचे नेतृत्त्व केले. या मोर्चात शहरातील महिला आणि पुरुषांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. शहरातील आझाद मैदानातून हा मोर्चा काढण्यात आला. शहरातील प्रमुख मार्गांवरून शासनाचा निषेध नोंदवित मोर्चा जिल्हा कचेरीवर धडकला. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. (स्थानिक प्रतिनिधी)
ओबीसींच्या आरक्षणासाठी कुणबी समाजाचा मोर्चा
By admin | Updated: August 24, 2014 00:15 IST