हजार वर्षांपूर्वीची गुफा : दुर्लक्षितपणाचा जंगलाला लागला शापविलास मोवाडे पुनवटजिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर व चंद्रपूर जिल्ह्याला लागून असलेल्या कवडशीच्या जंगलात प्राचीन किल्ला आहे. या जंगलात एक हजार वर्षांपूर्वीची गुफाही आहे. मात्र या जंगलाला दुर्लक्षितपणाचा शाप लाभल्याने या किल्ल्याकडे कुणाचेच लक्ष नाही.वणी तालुक्यातील अगदी शेवटच्या टोकावर पुनवट-कवडशी गाव आहे. या गावाजवळून वाहणाऱ्या निर्गुडा नदीलगत घनदाट जंगल व मोठमोठे पहाड आहेत. या जंगलामध्ये फिरताना मोठ्या पहाडाजवळ पाषाण काळातील शस्त्रही आढळून येतात. जवळजवळ एक हजार वर्षांपूर्वी या जंगलात ‘आदीमानवा’च्या टोळ्या राहात असाव्यात, असे गावकरी सांगतात. हा परिसर दगडी पहाडांनी व्यापलेला आहेत. काही फूट उंचीवर एक प्राचीन किल्ला आणि दुसरीकडे एक गुफा आहे. तेथेच एका पहाडावर मल्ल्हारगड दत्त देवस्थान आहेत. पूर्वी गोंड राज्याच्या काळात हा किल्ला बांधण्यात आला असावा, असा कयास आहे. किल्ल्यालगतच एका पहाडामध्ये आदिवासी बांधवाच्या देवाची मूर्ती आहे. येथील ग्रामस्थ त्या देविला ‘भानाबाई’ या नावाने ओळखतात. काही वर्षांपूर्वी शिरपूर येथे गोंड राजा राज्य करीत होता. तेथे या राजाने मातीचा किल्ला बांधला आहे. या जंगलातील किल्ल्याची निर्मितीही त्याच राजाने केली असावी, असा कयास आहे. येथून दक्षिण दिशेला एका पहाडात मानवनिर्मित गुफा आहे. दुसऱ्या पहाडात प्राचीन दत्तात्रेय मंदिर आहे. या मंदीराला शेकडो वर्षे झाली आहे. तेथेच पायथ्याशी जंगलातील वन्यप्राण्यांची तहान भागविण्यासाठी तलाव खोदलेला आहे. या परिसरात शंकर, गणेश आणि अनेक देवी-देवतांच्या दगडाच्या मूर्ती आहेत. प्राचीन काळातील या मंदिरात तत्कालीन ऋषी-मुनींकरिता तपस्येचे ठिकाण म्हणून खोल्या आहेत. आजही या ठिकाणी काही साधू-संत येऊन ध्यान करतात, हे विशेष. तेथे आता जगन्नाथ महाराजांचा मठ तयार करण्यात आला आहे. तसेच अनेक छोटी मंदिरे आहेत. या पहाडाचे काही वर्षांपूर्वी सर्वेक्षण करण्यात आले होते. त्या सर्वेक्षणात पहाडात ‘तांबे’ हा धातू असल्याचे आढळून आले होते. या ठिकाणी नैसर्गिक सौंदर्य स्थळे व प्राचीन काळाचा वारसा सांगणारे पौराणिक मंदिर आहे. हा परिसर ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार ठरलेला आहे. नावाजलेल्या पर्यटन स्थळाला लाजवेल, असा हा परिसर आहे. मात्र या स्थळाकडे पर्यटनाच्या दृष्टीने कधीच बघण्यात आले नाही. शासनाने या परिसराकडे लक्ष देऊन या परिसराचा विकास केल्यास पर्यटन स्थळ निर्माण होऊ शकते.लोकप्रतिनिधींची प्रचंड उदासीनताकवडशीच्या जंगलात प्राचीन ठेवा आहे. हा परिसर अत्यंत निसर्गरम्य आहे. वणी ते घुग्गुस मार्गालतच हे जंगल आहे. सध्या दळवळणाच्या सोयी जवळपा उपलब्ध आहे. वणी ते घुग्गुस मार्गापासून हा परिसर जवळ आहे. त्यामुळे या परिसरात पर्यटन स्थळाचा विकास केल्यास वणी तालुक्यातील जनतेला पर्यटन स्थळ उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे तालुक्यातील जनतेला विरंगुळ्याचे साधन मिळू शकते. मात्र शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी प्रचंड उदासीन आहे. परिणामी हा प्राचीन ठेवा आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
प्राचीन ठेवा दुर्लक्षितच
By admin | Updated: June 3, 2015 00:08 IST