यवतमाळ : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ समितीने केलेल्या शिफारशीनुसार बांधकाम कामगारांना विमा सुरक्षा मिळणार आहे. त्यांना आरोग्य व वैयक्तिक अपघात विमा योजना लागू करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाला सादर केला आहे. या संदर्भातील कंत्राट दिलेल्या विमा कंपनीने पूर्वीचा ३७ कोटी रुपयांचा प्रस्ताव सुधारित करून दिला असून सुधारित प्रस्तावाची रक्कम आता २० कोटी रुपये केली आहे. सुधारित प्रस्तावास पुढील एक वर्ष कालावधीसाठी शासनाने काही अटींसह मान्यता प्रदान केली आहे. आरोग्य व वैयक्तिक विमा योजना लागू करण्यासाठी मंडळाने विहित व पारदर्शक कार्यप्रणालीच अवलंब करणे आवश्यक आहे. होणाऱ्या खर्चात कोणत्याही प्रकारची अनियमितता होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे काही झाल्यास याची जबाबदारी कामगार आयुक्तांची राहील, असेही उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने म्हटले आहे. यापूर्वीसुद्धा बांधकाम कामगारांसाठी आरोग्य व अपघात विमा योजना प्रायोगिक तत्वावर २३ जुलै २०१३ पासून लागू करण्यात आली होती. त्यासाठी विमा कंपन्यांची ‘ब्रोकर’ म्हणून नियुक्ती केली होती. त्यावेळी बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे विमा हप्त्यापोटी ३७ कोटी ३ लाख १७ हजार १०५ रुपये सबंधित विमा कंपनीला देण्यात आले होते. परंतु आजमितीस केवळ ९७८ बांधकाम कामगारांना केवळ ३ कोटी ८२ लाख ६६ हजार ४८ रुपये रकमेचाच लाभ या विमा योजने अंतर्गत मिळाला. परंतु मंडळाने भरलेला ३७ कोटी रुपयांचा विमा हप्ता त्या तुलनेत फार जास्त आणि मिळालेला लाभ हा अत्यल्प होता. त्यामुळे ही योजना त्यावेळी फारशी फलदायी ठरली नाही. २५ जुलै १४ रोजी या योजनेचा कालावधी संपुष्टात आला. त्यानंतर बांधकाम कामगारांच्या भविष्याचा विचार करून मंडळाने राज्य व राष्ट्रीयस्तरावरील विविध पर्यायांची चाचपणी केली. सर्व पर्यायांच्या विचाराअंती बांधकाम कामगारांना आरोग्य व वैयक्तिक विमा योजना तीन वर्षांसाठी लागू करण्याचा निर्णय घेतला. तसा प्रस्ताव शासनाला पाठविला. परंतु शासनाने सध्या एक वर्षासाठी ही योजना लागू केली आहे. यामुळे कामगारांमध्ये समाधान व्यक्त होत असले तरी लाखो कामगार अद्यापही विम्यापासून वंचित आहेत. (प्रतिनिधी)
बांधकाम कामगारांना विमा कवच
By admin | Updated: September 10, 2014 00:00 IST