राजूरचे वास्तव : पर्यावरण विभागाचे आडमुठे धोरण, लघु उद्योजक झाले निराशवणी : तालुक्यातील ‘मिनी इंडिया’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या राजूर (कॉलरी) येथे ब्रिटिशकाळापासून चुना उद्योग सुरू आहे. मात्र आता पर्यावरण विभागाच्या आडमुठ्या धोरणामुळे या चुना उद्योगाला घरघर लागली. परिणामी लघु उद्योजक, चुना भट्टी व गिट्टी खाणीत काम करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे.‘मिनी इंडिया’ म्हणून राजूरची (कॉलरी) जिल्ह्यात ओळख आहे. तेथे ब्रिटिशांच्या काळातच चुना उद्योगाला सुरूवात झाली होती. राजूर येथे कोळशाची भूमिगत खाणही होती. चुना आणि कोळसा उद्योगात काम करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून तेथे कामगार आले. आता अनेक जण तेथेच स्थायीक झाले आहेत. तालुक्यात राजूरची लोकसंख्या सर्वाधिक आहे़ तेथे सर्व धर्मीय, सर्व भाषिक जनता वास्तव्याला आहे. चुना आणि कोळसा उद्योगामुळे राजूला ‘मिनी इंडिया’ अशी ओळख मिळाली आहे. राजूरमध्ये परप्रांतातील नागरिकांची मोठी संख्या आहे. उत्तरप्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, छत्तीसगड, आसाम आदी राज्यातील नागरिक तेथे वास्तव्यास आहेत. चुना आणि कोळसा उद्योगात ते काम करतात. तेथे ब्रिटिश काळापासून भूमिगत कोळसा खाण होती़ त्यामुळे परप्रांतील कामगार मोठ्या संख्येने तेथे आले. तेथील कोळसा आणि चुन्याला राज्यात व देशात मोठ्या प्रमाणात मागणी होती़ मात्र सध्या कोळसा खाणीतील उत्पादन बंद झाले आहे. तेथे ब्रिटिश काळातच चुना तयार करणाऱ्या चुनाभट्ट्या निर्माण झाल्या. यापूर्वी तेथे जवळपास ४0 चुनाभट्ट्या होत्या. चुना तयार करण्यासाठी लागणारा डोलोमाईट, लाईम स्टोन या कच्या मालाचे उत्पादन करणाऱ्याही तेथे १५ खाणी होत्या. मात्र सध्या चुना तयार करणाऱ्या सात ते आठ भट्ट्या व दोन ते तीन गिट्टीच्या खाणीच तेवढ्या सुरू आहे. चुना उद्योगासाठी लागणारा डोलोमाईट, लाईम स्टोनच्या खाणींना पर्यावरण विभागाने मोठ्या उद्योगांच्या अटी व शर्ती लागू केल्यामुळे या उद्योगावर सक्रांत आली आहे. अटी, शर्तीची पूर्तता करणे शक्य नसल्याने लघु उद्योजक संकटात सापडले आहेत. पर्यावरण विभागाच्या जाचक अटी व शर्तींमुळे चुना उद्योगाला कच्चा माल पुरविणाऱ्या अनेक खाणी आता बंद पडल्या आहेत. त्या खाणींमध्ये कार्यरत कामगार बेरोजगार झाले आहेत. यासोबतच शासनाच्या गौण खनिज कराचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष नुकसान होत आहे़ कच्चा माल मिळत नसल्याने चुना तयार करणाऱ्या लघु उद्योजकांवर भट्टे बंद करण्याची वेळ आली. परिणामी डोलोमाईट व चुना भट्ट्यांवर काम करणारे मजूर बेरोजगार होत आहेत. त्यांना इतर काम मिळणेही दुरापास्त झाले आहे. सणासुदीला राजूरच्या चुन्याला पूर्वी मोठी मागणी होती. आता बहुराष्ट्रीय कंपन्यांनी प्रक्रिया करून तयार केलेल्या रंगांमुळे दिवसेंदिवस चुन्याचा वापरही कमी होत आहे. त्यामुळे चुन्याचे उत्पादनही कमी झाले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)कच्चा माल मिळत नसल्याने गोंधळकच्च्या मालाच्या खाणीच नसल्याने आता कच्चा मालही महागला आहे़ सोबतच दर्जेदार कोळसाही मिळत नाही़ कोळशावरील शासकीय अनुदानही बंद करण्यात आले आहे. पर्यावरण विभागाच्या जाचक अटींमुळे आता डोलोमाईट, लाईम स्टोनची चोरी होतानाही दिसत आहे. महसूल विभागाने अनेकदा अशा चोऱ्या उघडकीस आणल्या आहेत. यातून गौण खनिजापासून मिळणारी रॉयल्टीही बंद झाली आहे. त्यामुळे एकूण राजूर येथील चुना उद्योगाला आता घरघर लागली आहे. महाराष्ट्रातील चुना उद्योग सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे बंद अवस्थेत असून सरकारकडून या उद्योगाला पुरविण्यात येणारा अनुदानित कोळसा बंद केला. चुना दगड मायनिंगची सुनावणी न झाल्यामुळे व टी.पी. नसल्यामुळे कच्चा माल मिळत नाही. सरकारने या उद्योगांवर लक्ष केंद्रीत करून या उद्योगांसाठी नवीन तंत्रज्ञानानुसार कर्ज मंजूर करावे व महाराष्ट्रात येणारा राजस्थान व इतर राज्यातील चुना आयातीवर निर्बंध लावावा.- लतिफ खानचुना उद्योजक, राजूर
चुना उद्योगाला लागली घरघर
By admin | Updated: June 20, 2015 00:13 IST